Apr06
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Wednesday, 6th April 2016
संपूर्ण तणावमुक्तीचे विहंगम दर्शन: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकरआपल्याला; आपल्या स्वत:च्या अंतर्यामी; नामरुपी चैतन्यसूर्य उगवून तळपताना दिसतो! सूर्य ज्याप्रमाणे सूर्यमालेच्या केंद्रस्थानी असतो, कुठल्यातरी कोपऱ्यात नाही, त्याप्रमाणे नामसूर्य आपल्या अखिल जीवनाच्या केंद्रस्थानी असून आपले अंतर्बाह्य सर्व जीवन संचालित आणि प्रकाशित करतो आहे हे स्पष्ट दिसते.
कला, व्यवस्थापन, विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, शेती इत्यादी; जीवनाची सर्व ज्ञानक्षेत्रे अंतर्यामीच्या चैतन्यातून उगम आणि स्फुरण पावून चैतन्याद्वारेच नियंत्रित होत आहेत आणि विश्वहितकारी होत आहेत हे स्पष्ट दिसते.
जगभरातल्या महानुभावांना अभिप्रेत असलेला आणि गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णानी अधिकारवाणीने पुरस्कृत केलेला विश्वकल्याणकारी स्वधर्म; प्रगट होण्यासाठी आज प्रत्येकाच्या हृदयात उसळी घेताना दिसते! वेगळ्या शब्दात सांगायचं तर; वेगवेगळ्या कंपन्या, कारखाने, दवाखाने, दुकाने, प्रयोगशाळा, बालवाड्या, आश्रमशाळा, विद्यालये, महाविद्यालये, रुग्णालये, दवाखाने, सरकारी कार्यालये इत्यादी सर्वच ठिकाणी सत्प्रेरणा, सद्बुद्धी, सद्विचार, सदभिरुची, सद्भावना, सद्वासना, सत्संकल्प, सत्कर्म आणि सदाचार हे सर्व; वैयक्तिक आणि सामाजिक अशा सर्वच पातळ्यांवर व्यक्त होण्यासाठी सर्वांतर्यामातून प्रगत होताना दिसते!