World's first medical networking and resource portal

Articles
Category : All ; Cycle : August 2015
Medical Articles
Aug22
गुरुकृपेची महती;चैतन्यमय होत जाणे! डॉ. श्री&#
गुरुकृपेची महती;चैतन्यमय होत जाणे! डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर

विद्यार्थी: कुंभ मेळाच नव्हे तर, अनेक बाबींबद्दल आपल्याला फारसे काही कळत नाही असे जाणवते. निसर्ग किती अनादि आहे, जग किती विशाल आहे आणि त्यात आपले जीवन किती टीचभर आणि क्षणभंगुर आहे!

शिक्षक: म्हणूनच “मोलाचे आयुष्य दवडीसी वाया मध्यान्हीची छाया जाई वेगे” असे म्हणतात. आपल्या विस्मृतीत गेलेले अजरामर चैतन्य ओळखणे, आठवणे आणि अखेर आपण तेच आहोत असा अनुभव घेणे हे जीवनाचे मुख्य उद्दिष्ट आहे आणि प्रत्येक क्षण आपण त्यासाठी खर्च करण्याची आपल्याला सुवर्ण संधी आहे. त्यातच जीवनाची खरी पूर्णता आणि सार्थकताही आहे! एका दृष्टीने पाहता; सार्थक जीवनाची ही कथाच अजरामर रामकथा वा चैतन्यकथा आहे.

विद्यार्थी: होय. चैतन्य वगळले तर आपल्यात काहीच नाही! भूकंप, ज्वालामुखी, सुनामी अशा निसर्गाचे अगाध सामर्थ्य दाखवणाऱ्या घटनाच नव्हेत तर; प्राणी जीवनामध्ये आणि मानवी जीवनामध्ये देखील अशा असंख्य बाबी आहेत की त्या व्यक्तिश: आपल्या आवाक्याबाहेर आहेत! कुंभ मेळ्यातले साधुच पहा ना! ते ज्या गोष्टी करतात, त्या आपल्यासाठी अशक्यच असतात.

शिक्षक: अगदी बरोबर आहे! जे अगदी सोप्यातले सोपे साधन आहे; असे आपण म्हणतो, ते नामस्मरण देखील रोज एवढे करणार म्हणून होतेच असे नाही!

पण गुरुकृपेमुळे एक महत्वाची बाब मला कळली, ती अशी की आजपर्यंत अब्जावधी लोक जाणूनबुजून नामस्मरण; म्हणजेच ईश्वराचे, म्हणजेच स्वत:च्या अंतरात्म्याचे स्मरण करीत आले आहेत; हे उघड उघड दिसत असले तरी आपल्याला अंतर्बाह्य व्यापणाऱ्या विश्वचैतन्याची जननी, गुरुमाउली; चैतन्याच्या कृपावर्षावाच्या रुपात; आपले सर्वांचे स्मरण, भरण, पोषण आणि संचालन; अनादी कालापासून अदृश्यपणे करीत आली आहे आणि अनंत कालपर्यंत करीत राहणार आहे; हे उघड दिसत नाही! साहजिकच ही मनाला दिलासा देणारी बाब एरवी लक्षात येत नाही.

गुरुकृपेची महती अशी की; नामस्मरणाद्वारे; आपण चैतन्यमय होत जाणे, आपले वैयक्तिक आणि सामाजिक कल्याण होणे; हे अटळ बनले आहे. ते; टाळू म्हटले तरी टाळता येणार नाही!

विद्यार्थी: धन्यवाद सर! रोजच्या कटकटी जीवन नकोसे करतात. त्यातच वाढती हिंसा आणि वाढता अनाचार; यांमुळे जीवन नकोसे होते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचा हा अनुभव सांगून फारच मोठ्ठा धीर दिला आहे. एरवी आमच्या बळावर आम्ही इतरांना सोडाच, स्वत:ला देखील चेतना देऊ शकत नाही! गुरुकृपाच आपल्या सर्वांसाठी संजीवनी आहे!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (1569)  |  User Rating
Rate It


Aug22
स्वत: त्याचा अनुभव घ्यावा!: डॉ. श्रीनिवास जना
स्वत: त्याचा अनुभव घ्यावा!: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर

विद्यार्थी: कुंभ मेळ्यामध्ये आपल्याला अचंबित करणाऱ्या, थक्क करणाऱ्या गोष्टी दिसतात आणि आपले मन अद्भुत रसाने भरले जाते. आपली मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे देखील विस्मयकारक असतात! महान विभूतींचे जीवन देखील अद्भुत असते! ह्यातले बरेच काही; आपल्या तर्कशास्त्रामध्ये किंवा आपल्या मूल्यव्यवस्थेमध्ये बसत नाही. तरीपण; प्राचीन रूढी, परंपरा, मन्दिरे आणि तीर्थक्षेत्रे; ह्यांच्याबद्दल आपल्याला आपल्या मनांत विलक्षण आकर्षण, कुतुहूल आणि आस्था असल्यामुळेच टिकून आहेत का?

शिक्षक: होय. ह्या सर्व बाबी आस्थेमुळेच टिकून राहिल्या आहेत आणि त्या नामस्मरणाला पोषक होण्यासाठीच आहेत यात शंका नाही.

रूढी आणि परंपरांप्रमाणेच खुद्द नामस्मरणाचे देखील आहे. नामस्मरण करता करता आपल्याला एकदम अमृतत्वाचा साक्षात्कार झाला असे होत नाही. आपल्याला टप्प्या-टप्प्यानेच पुढे जाता येते आणि ह्या टप्प्यांवर घडणाऱ्या अनेक चित्रविचित्र, चमत्कारिक, हृदयस्पर्शी आणि भारावून टाकणाऱ्या मनोवेधक घटनांमुळेच; आपले नामस्मरण टिकून राहते. कारण ह्या बाबी; नामस्मरणाची गोडी वाढवतात आणि आपल्याला नामस्मरणात गुंतवून ठेवतात!

विद्यार्थी: नामस्मरणाद्वारे अंतीम सत्याचा आणि अमरत्वाचा अनुभव लगेच येत नाही आणि तो कुणाला आणि केव्हा येईल, हे सांगता देखील येत नाही. त्याचप्रमाणे नामस्मरणाने समृद्धी देखील येतेच असेही नाही. त्यामुळे नामस्मरण करताना सामान्यांच्या विशेषत: गोरगरीबांच्या चिकाटीची कसोटी लागते, आणि त्याचा धीर सुटू शकतो ना?

शिक्षक: होय. खरे आहे. पण गोर गरीबच नव्हे तर आपण सारे; पुन्हा पुन्हा चैतन्याच्या विस्मृतीत जातो आणि त्यामुळे; विषयांकडे आकर्षित होत राहतो, त्यांच्या भूलभूलैय्यात अडकत राहतो, हरवत राहतो आणि चैतन्याला पारखे होतो. इंद्रियगम्य स्थूल विषय आणि दृश्य विश्वाच्या आकर्षणाचा जोर इतका जबरदस्त असतो की आपली धाव आपोआप चैतन्याच्या विरुद्ध दिशेला वळते! साहजिकच आपण भलतीकडेच भरकटत जातो! परिणामी; आपली अस्वस्थता काही केल्या कमी होत नाही आणि पूर्णत्व, सार्थकता आणि समाधान आपल्यापासून दूरच राहतात!

पण; काळजी करण्याचे कारण नाही. आपल्या इच्छे-अनिच्छेपलिकडे; विश्वचैतन्याची जननी आपल्याला चैतन्यामृतपान करवीत आहे. आपल्यामध्ये नवचेतना भरत आहे. आपल्याकडून नामस्मरण आणि स्वधर्मपालन करवीत आहे. सदिच्छा, सत्संकल्प, सत्प्रेरणा, सत्बुद्धी, सद्भावना, सद्वासना, सदाचार यांनी आपले व्यक्तिगत आणि सामाजिक जीवन भरून टाकीत आहे. ह्यावर विश्वास ठेवू नये; तर; नामस्मरण करता करता स्वत: त्याचा अनुभव घ्यावा!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (1446)  |  User Rating
Rate It


Aug22
विलक्षण साधना: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळी
विलक्षण साधना: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर

विद्यार्थी: सर, कुंभ मेळ्याच्या निमित्ताने अनेक साधू विलक्षण साधना करीत असताना दिसतात. सत्य जाणून घेण्यासाठी अशा कठीण साधनांची आवश्यकता आहे का?

शिक्षक: त्यांच्यासाठी ती आवश्यक आहे की नाही हे आपण कोण ठरविणार? प्रत्येक व्यक्ती आणि तिचे संचित आणि प्रकृती भिन्न असते. जडण घडण वेगवेगळी असते. संस्कार वेगळे असतात. आर्थिक, धार्मिक, सामाजिक, भौगोलिक इत्यादी प्रकारची पार्श्वभूमी वेगवेगळी असते.
मुलाला कशाची गरज आहे हे आईला ज्याप्रमाणे कळते आणि ती मुलाला दूध देते; त्याप्रमाणे आम्हाला आमच्याच हृदयातील चैतन्याची तहान लागली आहे हे आमची (आमच्यातल्या चैतन्याची) जननी ओळखते. पण विचित्र बाब अशी की आम्हाला आमची तहानही कळत नाही आणि समोर आलेल्या चैतन्याचे महत्वही समजत नाही! किंबहुना ते चैतन्य ओळखण्याची बुद्धी आणि ते पिण्याची क्षमताच आमच्यामध्ये नसते! त्यामुळे समोर आलेले चैतन्य आम्ही लाथाडतो! पण आमचा हटवादीपणा, आक्रस्ताळेपणा, नतदृष्टपणा पदरात घेऊन, कधी गोंजारून तर कधी वेळ पडल्यास धाकदपटशाने वा आम्हाला शिक्षा देऊन आमची माउली आमची तहान भागवतेच! मातृत्व हे वैश्विक असले तरी प्रत्येकाच्या स्थूल देहाची आई वेगवेगळी असते, हे जसे खरे, तसेच आपल्याला चैतन्यपान घडवणारी आपल्यातल्या चैतन्याची आई देखील, जरी मूलत: एकच असली तरी, व्यावहारिक दृष्ट्या वेगवेगळी असते. हिलाच आपण कधी “कुलदेवता”, कधी “इष्टदेवता” तर कधी “आपली गुरुमाउली” म्हणून ओळखू लागतो ! याकारणास्तव आपल्या परंपरेनुसार आलेली साधना आणि उपासना आपल्यासाठी सुलभ आणि परिणामकारक असते. इतरांच्या उपासनेशी आपल्या उपासनेची तुलना करणे योग्य ठरत नाही आणि उपयुक्तही ठरत नाही. श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर हीच माझी गुरुमाउली. त्यांच्याच चरित्र आणि वाङमयाद्वारे; जीवन म्हणजे अजरामर वैश्विक चैतन्याचा अंश आहे आणि हे चैतन्य म्हणजेच नाम असून या चैतन्याचा अनुभव घेण्याचे सर्वोत्तम साधन म्हणजे नामस्मरण आहे हे मला नीट समजू लागले. विशेष म्हणजे नामस्मरण हा सर्वंकष वैयक्तिक आणि सामाजिक कल्याणाचा राजमार्ग आहे; आणि नामस्मरणाशिवाय शाश्वत समाधान, सार्थकता आणि पूर्णत्व साध्य होऊ शकत नाहीत याची खात्री झाली. बाळाचे भूकेलेपण, त्याचे रडणे आणि आईचे त्याला दूध पाजणे हे तीनही एकत्र आले की उभयतांची तृप्ती होते! श्री. ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर ह्या माउलीने रामनामाचे अमृतपान करवून अशी तृप्ती साध्य केली.


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (1454)  |  User Rating
Rate It


Aug22
चैतन्यतृष्णेपायी, चैतन्यामृतपानासाठी आण
चैतन्यतृष्णेपायी, चैतन्यामृतपानासाठी आणि चैतन्यमय होण्यासाठी: डॉ. श्रीनिवास कशाळीकर

विद्यार्थी: काहीजण असे म्हणतात की कुंभ मेळ्यातील साधुंनी फक्त अध्यात्माबद्दल बोलावे. त्यांनी राजकारणाबदल बोलू नये. तुम्हाला काय वाटते?

शिक्षक: अध्यात्म ह्यांचा अर्थ स्वभाव. भगवद्गीतेच्या आठव्या अध्यातात स्पष्टपणे ही व्याख्या दिलेली आहे. अध्यात्म हा इतिहास, भूगोल यासारखा विषय एक विषय नाही. अध्यात्म हा संपूर्ण अस्तित्वाचा मूळ स्वभाव आहे.

अध्यात्मिक होणे म्हणजे तो मूळ स्वभाव जाणणे, स्मरणे आणि तद्रूप होणे आहे. खरे पाहता; गर्भावस्थेत आल्यापासून आपल्या शरीरात आणि आपल्या मनात जे जे म्हणून काही घडते ते ते सारे; खरे पाहता आपल्यामधील चैतन्यतृष्णेपायी, चैतन्यामृतपानासाठी आणि चैतन्यमय होण्यासाठी घडत असते! म्हणजे आपण सर्वच जण मूलत: अध्यात्मिकच असतो.
पण एकीकडे आपल्याला कशाची तृष्णा आहे हे आपल्याला कळत नाही आणि दुसरीकडे; आपला मूळ स्वभाव, आपल्या अंतर्बाह्य बरसणारे चैतन्य आपल्याला ओळखता येत नाही. हे चैतन्य अदृश्य असते. ते आपल्याला दिसत नाही. ते अश्राव्य असते. त्याची चाहूल लागत नाही. थोडक्यात; ते इंद्रियातीत असते. कर्मेंद्रियांच्या आणि ज्ञानेंद्रियांच्या पलीकडे; म्हणजेच जाणीवेच्या पलीकडे असते. बुद्धीच्या आवाक्याच्या पलीकडे असते. ह्यातच भर म्हणून की काय; ह्या चैतन्याची विस्मृती झाल्यामुळे ते समीप असूनही दूरच राहते!

पण असे असले तरी त्या चैतन्याची जननी आपल्यावर पांखर घालण्याचे आपले काम करीतच असते. ती आपली पाठ सोडीत नाही! त्यामुळे चैतन्याचा “चुंबकीय” प्रभाव आपल्यावर पडतच असतो. त्याची अनाकलनीय अशी ओढ आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. ही कोणती ओढ आहे हे आपल्याला कळत नाही. त्यामुळे गीतेच्या सातव्या अध्यायात तिसऱ्या श्लोकात म्हटल्याप्रमाणे हजारो लोकांमध्ये एखादाच अध्यात्माच्या शोधात धडपडतो. आणि अशा हजारो धडपडणाऱ्या लोकांमध्ये एखादाच खरा खुरा अध्यात्मिक होतो. पण बाकीचे धडपडणारे धडपडत असतात. त्या धडपडणाऱ्यांचे बाह्य रूप सामान्यांपेक्षा वेगळे असते. ह्या खास वेगळ्या बाह्य स्वरूपामुळे बऱ्याच जणांना असे वाटते की अध्यात्म हा आपल्या रोजच्या जीवनापासून वेगळा असा प्रांत आहे, वेगळे प्रावीण्य आहे. ह्या बाह्य अंगाने साधु असणाऱ्या लोकांना जीवनाच्या सर्व अंगांबद्दल मतप्रदर्शन करण्याची कुवत नसतेच.

परंतु, परिपूर्ण अध्यात्मिक व्यक्तीला जीवनाच्या सर्व अंगांबद्दल मतप्रदर्शन, मार्गदर्शन आणि नेतृत्व करण्याचा निश्चित अधिकार आहे. स्थितप्रज्ञ व्यक्तींच्या प्रत्यक्ष नेतृत्वाखाली जगाचे कल्याण होईल यात तीळमात्र शंका नाही.


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (1511)  |  User Rating
Rate It


Aug22
चैतन्यप्रभातीची अस्सल प्रचीती: डॉ. श्रीनि
चैतन्यप्रभातीची अस्सल प्रचीती: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर

विद्यार्थी: कुंभ मेळा पवित्र होईल आणि निरुपद्रवी होईल आणि चैतन्यप्रभात होईल ही भाकिते भ्रामक वाटतात. कारण जगामध्ये मन प्रसन्न करणाऱ्या घटनांबरोबरच मन खिन्न करणाऱ्या असंख्य घटना देखील हरघडी आढळतात.

शिक्षक: खरे आहे. म्हणूनच; आपली फसवणूक टाळण्यासाठी आपल्या अंतर्यामी डोकावले पाहिजे. तसे केले असता चैतन्यप्रभातीच्या ह्या दृश्य आणि ढोबळ लक्षणांव्यतिरिक्त; आपल्याला; आपल्या स्वत:च्या अंतर्यामी; नामरुपी चैतन्यसूर्य उगवून तळपताना दिसतो! सूर्य ज्याप्रमाणे सूर्यमालेच्या केंद्रस्थानी असतो, कुठल्यातरी कोपऱ्यात नाही, त्याप्रमाणे नामसूर्य आपल्या अखिल जीवनाच्या केंद्रस्थानी असून आपले अंतर्बाह्य सर्व जीवन संचालित आणि प्रकाशित करतो आहे हे स्पष्ट दिसते. ह्या नामसूर्याच्या दर्शनातून चैतन्यप्रभातीची खरीखुरी आणि अस्सल प्रचीती येते.

कला, व्यवस्थापन, विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, शेती इत्यादी; जीवनाची सर्व ज्ञानक्षेत्रे अंतर्यामीच्या चैतन्यातून उगम आणि स्फुरण पावून चैतन्याद्वारेच नियंत्रित होत आहेत आणि विश्वहितकारी होत आहेत ह्याची हरघडी प्रचीती राहते.

जगभरातल्या महानुभावांना अभिप्रेत असलेला आणि गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णानी अधिकारवाणीने पुरस्कृत केलेला विश्वकल्याणकारी स्वधर्म; प्रगट होण्यासाठी आज प्रत्येकाच्या हृदयात उसळी घेत आहे! वेगळ्या शब्दात सांगायचं तर; वेगवेगळ्या कंपन्या, कारखाने, दवाखाने, दुकाने, प्रयोगशाळा, बालवाड्या, आश्रमशाळा, विद्यालये, महाविद्यालये, रुग्णालये, दवाखाने, सरकारी कार्यालये इत्यादी सर्वच ठिकाणी सत्प्रेरणा, सद्बुद्धी, सद्विचार, सदभिरुची, सद्भावना, सद्वासना, सत्संकल्प, सत्कर्म आणि सदाचार हे सर्व; वैयक्तिक आणि सामाजिक अशा सर्वच पातळ्यांवर व्यक्त होण्यासाठी सर्वांतर्यामातून उसळी घेत आहेत!

माझा एक मित्र सतत नामस्मरण करीत असतो. ह्या माझ्या मित्राचा अनुभव असा की तो एकदा घरासमोरच्या उद्यानात फिरत असताना त्याला स्पष्टपणे जाणवले की त्या बागेतल्या प्रत्येक झाडात आणि पानाफुलात नामस्मरण चालू आहे! हा अनुभव काही त्याचा एकट्याचाच नाही! मनाची किंवा जाणीवेची सूक्ष्मता आणि संवेदनाक्षमता आल्यानंतर अनेकांना हा अनुभव आल्याचे दाखले आहेत. या अनुभवाचा मथितार्थ असा की आपल्या वैयक्तिक इच्छे-अनिच्छेपलिकडे चैतन्ययोगाची ही साधना आणि आविष्कार सर्वान्तर्यामी चालू आहे! नाम हे चैतन्यदायी अमृत आहे, किंवा चैतन्यामृत आहे. आपले अंतर्बाह्य व्यापणाऱ्या चैतन्यामृतामुळे आपला स्वत:चा स्वत:शी असलेला आणि स्वत:चा इतरांबरोबर चालणारा संघर्ष संपुष्टात येत जातो. आपल्या आणि इतरांमधल्या आंतरिक एकात्मतेची गोडी अनुभवाला येते.


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (1398)  |  User Rating
Rate It


Aug22
चैतन्याची हाक : डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळी&#
चैतन्याची हाक : डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर

विद्यार्थी: कुंभ मेळ्यामध्ये जमीन, पाणी, वीज, शौचकूप, स्नानगृहे इत्यादी अनेक सोयी सरकारी पैशातून म्हणजेच कर भरणाऱ्या जनतेच्या पैशातून पुरविल्या जातात. हीच बाब इतर यात्रांच्या आणि सार्वजनिक उत्सवांच्या बाबतीत देखील खरी आहे. धर्माचे रक्षण करण्यासाठी हे सर्व लागते का?

शिक्षक:. तमोगुण आणि रजोगुण वाढल्यामुळे वेड, वासना, आवडी, छंद, लहरी, फॅशन्स, व्यसने, विकृती; अशा बाबींसाठी अब्जावधी रुपये खर्च होत आहेत. संकुचित स्वार्थापायी फसवणे आणि फसले जाणे; हे सार्वत्रिक झाले आहे. त्यामुळे त्याचे प्रतिबिंब कुंभ मेळ्यात देखील पडते आहे.

जोपर्यंत नामस्मरण सर्वत्र पसरत नाही आणि झिरपत नाही, तोपर्यंत कुंभ मेळ्यामध्ये देखील आत्मसाक्षात्कारी निस्पृह संत महंत फार मोठ्ठ्या प्रमाणात सापडणे कठीण आहे. किंबहुना तोपर्यंत; कुंभ मेळ्यामध्ये देखील थकले-भागलेले, चुकले-माकलेले, गोर-गरीब, रंजले-गांजलेले, पोटासाठी वणवण करणारे लोकच जास्त आढळणे साहजिकच आहे.

ज्या अजरामर आंतरिक चैतन्याची हाक (Inner Voice) आपल्याला ऐकू येत नाही आणि ज्याच्यापासून तुटल्यामुळे आपण अचेतन आणि मरतुकडे बनलो आहोत, त्या अनादी, अनंत, सर्वव्यापी तसेच सर्वांच्या अंतर्यामी आणि बाहेर असलेल्या सच्चिदानंद “वस्तु”ला ओळखणे, समजणे, आठवणे आणि हळु हळु त्या “वस्तु”शी तद्रुप होणे; हा सर्व कुंभ मेळ्यातील आणि त्याच्या बाहेरील सर्वच दुरवस्थेवरील इलाज आहे. ह्या अनादी अनंत सच्चिदानंद वस्तूला ओळखण्याचे, समजण्याचे, आठवण्याचे आणि हळू हळू त्या वस्तुरूप होण्याचे अनादी साधन; ह्या वस्तूच्या नावाचे म्हणजेच नामाचे स्मरण म्हणजे नामस्मरण आहे.

विद्यार्थी: तुमच्या मते; नामस्मरणाच्याद्वारे वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवरील इतर विकृती ज्या प्रमाणात कमी होत जातील; त्या प्रमाणात कुंभ मेळ्यांचे स्वरूप देखील अधिक पवित्र आणि निरुपद्रवी होईल यात शंका नाही?

शिक्षक: होय. मला निश्चितपणे तसे वाटते.

विद्यार्थी: हे तुमचे भाकीत आहे?

शिक्षक: ही आपल्या सर्वांच्या अंतर्यामी राहून सदैव आपली काळजी घेणाऱ्या नामरूप चैतन्याची म्हणजेच आपल्या सर्वांच्या गुरूदेवांची कृपा आहे! प्रत्येकाच्या गुरुचे व्यावहारिक नाव गाव वेगवेगळे असले तरी प्रत्येकाच्या हृदयात जो नामरूप गुरु असतोच, त्याच्याच कृपेने आपल्या सर्वांना; नामस्मरणाच्या द्वारे होणारी चैतन्यप्रभात आणि स्वधर्म सूर्याचा उदय आणि त्यांचा कल्याणकारी प्रभाव यांचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (1421)  |  User Rating
Rate It


Aug22
चैतन्ययोग (नामस्मरणाबद्दल जिज्ञासा वाढत ç
चैतन्ययोग (नामस्मरणाबद्दल जिज्ञासा वाढत आहे?) : डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर

विद्यार्थी: कुंभ मेळ्याविषयी जगभर कुतुहूल वाढते आहे हे मला माहीत होते. पण नामस्मरणाबद्दल देखील कुतुहूल आणि जिज्ञासा वाढत आहे?

शिक्षक: होय! नक्कीच! जगभर नामस्मरण पहायला मिळते. कुणी जपमाळ घेऊन तर कुणी माळेशिवाय नामस्मरण करतो आहे. कुणी एका जागी बसून तर कुणी फिरत फिरत नामस्मरण करतो आहे. कुणी मोठ्ठ्याने उच्चार करून तर कुणी मनातल्या मनात, कुणी डोळे मिटून तर कुणी डोळे उघडे ठेवून, कुणी श्वासोच्छवासावर तर कुणी उत्स्फूर्त भावनेने आणि आर्ततेने नामस्मरण करतो आहे. कुणी घरी तर कुणी ऑफिसमध्ये, कुणी देवळात तर कुणी शाळेत, कुणी फॅक्टरीत तर कुणी रुग्णालयात; आणि कुणी दुकानात तर कुणी शेतात नामस्मरण करीत आहे!
प्रत्येक स्तरातला आणि वयातला, आणि प्रत्येक धंद्यातला आणि नोकरीतला माणूस; या ना त्या कारणास्तव नामस्मरणाकडे वळत आहे आणि त्यात मुरत आहे!
रेड़िओ-दूरदर्शनवर नामस्मरणाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात प्रसारित होऊ लागले आहेत. नामस्मरणाची महती गाणारी गीते, पदे, कविता, भजने वारंवार वेगवेगळ्या उत्सवांतून आणि समारंभांतून ऐकू येऊ लागली आहेत. देशविदेशांतून कीर्तनकार, रामकथाकार, भागवत कथाकार यांना मागणी वाढत आहे. वेगवेगळ्या दूरदर्शन मालिकांमधून नामस्मरणाचे गोडवे गायिले जात आहेत.
विशेष म्हणजे निर्हेतुक वृत्तीने आणि निष्काम भावनेने नामस्मरण केले असता; सर्वंकष वैयक्तिक आणि सामाजिक कल्याण कसे साध्य होते याचे विवरण करणारी पुस्तके, सीडीज, व्हिडीओ सीडीज मोफत वितरण केली जाऊ लागली आहेत आणि इंटरनेटवर मोफत डाऊन लोड साठी उपलब्ध केली जाऊ लागली आहेत. विशेष म्हणजे एरवी दुर्लक्षित राहणारी अशी ही पुस्तके लोक मोठ्ठ्या उत्सुकतेने आणि आस्थेने वाचत आहेत आणि सीडीज व व्हिडीओ सीडीज ऐकत आणि बघत आहेत!
नामस्मरण ही उतार वयात गलितगात्र झाल्यानंतर करण्याची किंवा रिकाम्या वेळात करण्याची, निरुपयोगी, निरुपद्रवी, दुर्लक्षित आणि कोपऱ्याताली बाब राहिलेली नाही. नाम आणि नामस्मरण ही जीवनाच्या नियंत्रक केंद्रस्थानी असल्याची जाणीव प्रकर्षाने होताना दिसत आहे. साहजिकच नामस्मरणाला सर्वाधिक महत्व आणि सर्वोच्च प्राधान्य आले आहे. जगभर नामस्मरणाचा अंत:करणपूर्वक स्वीकार, प्रसार आणि जयजयकार होत असून आपल्या सर्वांच्या वैयक्तिक आणि सामुहिक जीवनाची गाडी हजारो वर्षांच्या आणि हजारो लोकांच्या जन्मोजन्मीच्या पुण्याईने आज खऱ्या अर्थाने रुळावर येत आहे! ह्या सर्वंकष कल्याणालाच आपण चैतन्ययोग म्हणतो.


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (1454)  |  User Rating
Rate It


Aug22
नामात गोडी लागेपर्यंत: डॉ. श्रीनिवास जनार्
नामात गोडी लागेपर्यंत: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर

विद्यार्थी: आमच्यासारख्या लाखो लोकांना नामात गोडी लागेपर्यंत आनंददायक आणि उत्साहवर्धक अशा कुंभमेळ्याचा आणि इतर अनेक रूढी परंपरांचा उपयोग आहे हे खरेच आहे!

शिक्षक: निश्चित! चैतन्यविस्मृतीच्या अंध:कारातून, गदारोळातून आणि तणावातून मुक्त होण्यासाठी चैतन्य स्मृती हेच उत्तर आहे ह्याची जाणीव अधिकाधिक प्रकर्षाने होत असल्याने कुंभ मेळ्यासारख्या सर्व प्रथांमध्ये देखील अंतरात्म्याचे स्मरण अर्थात नामस्मरण हे प्रधान कर्म बनत आहे. नामस्मरणाला कुणी जप, म्हणतो तर कुणी जाप, कुणी सुमिरन म्हणतो तर कुणी सिमरन, कुणी जिक्र म्हणतो तर कुणी अंतरात्म्याचे स्मरण. पण मथितार्थ एकच!
आनंदाची बाब अशी की; चैतन्यविस्मृतीच्या गडद अंध:काराचा अंत होऊन चैतन्याचा प्रकाश जगभर पसरू लागला आहे!

केवळ भारतच नव्हे तर चीन, पाकिस्तान, बांगला देश वगैरे इतर आशियाई देशात आणि आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, युरोप, अमेरिका आदि सर्व खंडांमध्ये घराघरातून नामस्मरणाविषयी कुतुहूल आणि जागृती वाढताना दिसते आहे. मालक, संचालक आणि व्यवस्थापक कर्मचाऱ्यांना, शिक्षक विद्यार्थ्याना, डॉक्टर रुग्णांना, प्रसिद्ध व्यक्ती त्यांच्या चाहत्यांना आणि नेते अनुयायांना; नामस्मरणाचे महत्व खऱ्या तळमळीने सांगू लागले आहेत. पालक त्यांच्या मुलांना अगदी मनापासून नामस्मरण करायला शिकवू लागले आहेत. आपआपल्या धर्मानुसार आणि परंपरेनुसार नामस्मरण करण्याची जणू काही एक प्रचंड आणि विश्वव्यापी त्सुनामी लाट आली आहे. विश्वचैतन्याचा अनुभव घेणे आणि तो इतरांना सांगणे ही आस्थेची, नित्याची आणि सार्वत्रिक बाब झाली आहे.

मंदिरामंदिरामधून नामजपाचे सप्ताह आणि अनुष्ठाने होऊ लागली आहेत. नामसाधना कशी करावी ह्याचे मार्गदर्शन करणारी नामसाधना शिबिरे होऊ लागली आहेत. केवळ धार्मिक ठिकाणी आणि अध्यात्मिक संस्थांमध्येच नव्हे तर वेगवेगळ्या कंपन्या, कारखाने, दवाखाने, दुकाने, प्रयोगशाळा, अंगणवाड्या, बालवाड्या, आश्रमशाळा, विद्यालये, महाविद्यालये, रुग्णालये, दवाखाने, सरकारी कार्यालये इत्यादी सर्वच ठिकाणी नामस्मरणाचा दिव्य प्रकाश पसरताना दिसत आहे. पोलीसांच्या चौक्यांमधून आणि सैनिकी संस्थांमधून देखील नामस्मरणाची संजीवनी आपले संजीवक काम करताना दिसत आहे.

शेतकरी, कष्टकरी, तंत्रज्ञ, कारागीर, क्रीडापटू, कलाकार, बुद्धीजीवी, व्यवस्थापक, शासनकर्ते, सत्ताधारी असे; सर्वच जण नामस्मरणाकडे आकर्षित होत आहेत. एवढेच नव्हे तर; आज ज्यांच्याकडे पूर्वग्रहदूषितपणामुळे तुच्छतेने किंवा तिरस्काराने पाहिले जाते अशा अनेक व्यवसायांमधले व्यावसायिक देखील नामस्मरण करू लागले आहेत!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (1437)  |  User Rating
Rate It


Aug22
मधाचे बोट: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर
मधाचे बोट: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर

विद्यार्थी: लहान मुलाने औषध घ्यावे म्हणून ज्याप्रमाणे मधाचे बोट लावतात तसेच नामस्मरणामध्ये गोडी निर्माण व्हावी म्हणून; कुंभ मेळ्यासारखे मेळे, तीर्थयात्रा, वाऱ्या, उत्सव, सण, व्रते, महापूजा, नैवेद्य, महाप्रसाद, भोग, भजने, आरत्या; इत्यादींची योजना केली गेली आहे का?

शिक्षक: निश्चित! “देव”, “परमात्मा”, “ब्रह्म”, परमेश्वर; “राम”, “कृष्ण”, “शिव”, इत्यादी वेगवेगळ्या शब्दांचा किंवा नावांचा गर्भितार्थ एकच आहे आणि तो म्हणजे नामाच्या द्वारे जी वस्तू ओळखली जाते ती अनादी आणि अनंत वस्तू. ह्या अर्थाने “नाम” हे अनादी आणि अनंत आहे. ते सर्वव्यापी आहे. सर्वांच्या अंतर्यामी आणि सर्वांच्या बाहेर आहे. त्याची सत्ता बलवत्तर आहे असे संत म्हणतात.
परंतु; धर्म हा सर्वांच्यासाठी असल्यामुळे; आणि आपण सर्वसामान्य लोक; विषय सुखात रमत असल्यामुळे; अखंड नामस्मरण करणे प्रत्येकाला शक्य नाही. हे लक्षात घेऊनच धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ ठरवले गेले आणि स्वीकारले गेले. त्याअनुरोधानेच; कुंभ मेळ्यासारखे मेळे, तीर्थयात्रा, वाऱ्या, उत्सव, सण, व्रते, महापूजा, नैवेद्य, महाप्रसाद, भोग, भजने, आरत्या; इत्यादीं प्रत्येक मनोवेधक, रंजक, आकर्षक आणि भव्य दिव्य बाबीत नामस्मरण ठेवून; क्रमाक्रमाने जीवनातले सर्व रस उपभोगत अखेर; अंतीम सत्य अनुभवण्याची सोय केली गेली.
एक लक्षात ठेवणे जरूर आहे. अंतीमत: नामस्मरणात रमलेले साधू; पराकोटीचे निस्पृह असून वस्तुनिरपेक्ष आनंदच उपभोगत असतात. त्यांना कोणत्याही बडेजावाची आणि बाह्य उपचारांची गरज नसते. आंतरिक चैतन्याने ओतप्रोत भरल्याने आणि सर्व सामर्थ्य अंगी असल्याने; ते कोणाचेच मिंधे नसतात. त्यांना कसलीच गरज नसते! ह्या परमोच्च अवस्थेला “नामात गोडी येणे”, किंवा “नामात रमणे” म्हणतात!

विद्यार्थी: याचा अर्थ; सर्वात श्रेष्ठ आणि मुख्य जर काही असेल तर नामस्मरण आहे, नामाची गोडी लागणे आणि नामात रमणे आहे. पण हे विधान सर्वांना लागू पडते का? जरा समजावून सांगा ना!

शिक्षक: अर्थातच! वीजपुरवठा खंडित झाला की ज्याप्रमाणे सर्वच बल्ब प्रकाशहीन आणि निरुपयोगी बनतात त्याप्रमाणे चैतन्यविस्मृतीमुळे; आपण सर्वच जण त्या चैतन्याला पारखे होतो आणि निस्तेज आणि दुबळे बनतो. विशेष म्हणजे; त्या चैतन्याची तहान आपल्या सर्वांना लागलेली असताना देखील; त्याच्या विस्मृतीमुळे आपण तृषाक्रांत राहून “रडत” असतो, किरकिरत असतो! चैतन्य प्रत्येकात आहे, त्याची तहान सर्वांना आहे आणि त्याच्या विस्मृतीची बाधाही सर्वांना आहे; म्हणूनच चैतन्यस्मरणाचा वा नामस्मरणाचा मार्ग आपल्या सर्वांसाठी आहे!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (1408)  |  User Rating
Rate It


Aug22
वेगवेगळी देवस्थाने: डॉ. श्रीनिवास जनार्दन 
वेगवेगळी देवस्थाने: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर

विद्यार्थी: केवळ कुंभ मेळ्यामध्येच नव्हे तर आपल्याकडे जी वेगवेगळी देवस्थाने आहेत तिथला भपका देखील पुष्कळदा खटकतो.

शिक्षक: हे अगदी खरे आहे. आपल्या देशात कमालीची गरीबी आहे हे खरे आहे. त्यावर इलाज होणे अत्यावश्यक आहे हे देखील खरे आहे. पण समजा; असा झगमगाट बंद केला तर काय होईल? गरीबी दूर होईल? झगमगाटावरील पैसे गरीबांना वाटले तर ते श्रीमंत होतील? त्यांचे कल्याण होईल? त्यांचे कल्याण होणे म्हणजे तरी काय? केवळ पैसे मिळणे आणि ते वाट्टेल तसे उधळता येणे म्हणजे कल्याण होणे का?

विद्यार्थी: केवळ पैसे मिळणे म्हणजे कल्याण नव्हे. पण जेव्हां परिस्थिती आणीबाणीची आणि गंभीर असते; आणि समस्या जीवनमरणाची असते; तेव्हां गरीबांना ताबडतोब आणि थेट मदत मिळायला नको का? आपली परिस्थिती गंभीर नसल्यामुळे आपण गरीबांच्या हलाखीचा विचार करू शकत नाही! आपण फक्त गरीबीच्या मूळ कारणांचाच आणि केवळ त्यांवरील उपायांचाच विचार करतो.

शिक्षक: केवळ मूळ कारणांचा आणि त्यावरील उपायांचा विचार करणे अवास्तव आहे. पण; गरीबांना ताबडतोब मदत होणे हे जसे महत्वाचे आहे तसे; गरीबीची मूळ करणे दूर करणे देखील अत्यावश्यक आहे. खरे म्हणजे प्रत्यक्षात हे देखील एक चक्र आहे! गरीबीची समस्या केवळ गरीबीपुरती मर्यादित नाही. ती श्रीमंतीशी अविभाज्यपणे निगडीत आहे. आपल्या गरीबी आणि श्रीमंती; दोन्हींच्या मुळाशी तमोगुण आणि रजोगुण असून; त्यामुळे आपली गरीबी आणि आपली श्रीमंती दोन्ही विकृत बनल्या आहेत आणि परस्पर पूरक आणि परस्पर पोषक बनल्या आहेत! आपण सर्वचजण; गरीब असो वा श्रीमंत; दु:स्थितीतच आहोत! म्हणूनच आपल्या दु:स्थितीचे मूळ कारण (तमोगुण आणि रजोगुण) आणि तात्कालिक परिस्थिती या दोन्हींवर एकदमच उपाय करण्यासाठी नामस्मरण आणि तज्जन्य स्वधर्म हेच हवेत! केवळ तात्पुरत्या मदतीची ठिगळे लावून तात्पुरता आणि वरवरचा फायदा होईल खरा; पण केवळ तात्पुरती मदतच करीत राहिले तर तमोगुण आणि रजोगुण फोफावत जातील; आणि आपण आळस, बेपर्वाई, लाचारी, बेशिस्त, लबाडी, निर्दयता, वखवख, दिखाऊपणा, उथळपणा ह्यात तडफडत राहू! किंबहुना आज हेच चालले आहे!
नामस्मरणाने आंतरिक चैतन्याचा अनुभव येईल आणि आंतरिक सामर्थ्याची प्रचीती येईल. त्यातूनच स्वत:च्या आणि इतरांच्या कल्याणासाठी धैर्याने जगण्याचा आणि झटण्याचा उत्साह येईल. स्वधर्म प्रत्यक्षात येईल. जेव्हां जीवनाची सर्व क्षेत्रे आणि सर्व स्थळे; नामस्मरणाने भरून आणि भारून जातील; तेव्हां मंदिरांच्या एकांगी आणि अतिरिक्त झगमगाटाची गरज राहणार नाही.


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (1398)  |  User Rating
Rate It


Browse Archive