World's first medical networking and resource portal

Articles
Category : All ; Cycle : August 2016
Medical Articles
Aug21
गोंदवलेकर महाराज मला समजलेले : १०. देवाची (खर
१०. देवाची (खरी) कृपा डॉ. श्रीनिवास कशाळीकर

श्री. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात “देवाची ज्याच्यावर कृपा आहे त्याला तो पोटापुरता पैसा देतो, पण ज्याची परीक्षा पाहायची त्याला भगवंत जास्त पैसा देतो”.

आपल्यातल्या बहुतेकांना तर याच्या उलट वाटत असते! आपला समज असा असतो की जेवढा पैसा जास्त मिळेल, तेवढे आपण जास्त सुख मिळवू शकतो! त्यामुळे गडगंज पैसा मिळणे हेच भाग्याचे लक्षण आणि हीच देवाची कृपा असेच आम्हाला वाटत असते! अगदी मनापासून विचार केला तरी, पोटापुरत्या पैशाने सुख मिळू शकत नाही आणि म्हणून गरीबी हा शापच आहे असेच आम्हाला वाटत असते!

मग खरं काय? सद्गुरू की आपण?

उत्तर सोपं आहे!

पण सद्गुरूंच्या अनंत, परिपक्व आणि नि:पक्षपाती सर्वज्ञतेचा अभिप्राय असा की “जास्त पैसा” मिळाला की आपण भरकटू शकतो! आपल्या आकांक्षा वाढतात, वासना भडकतात, इर्षा उसळते, काळजी पोखरते, असंतोष खदखदू लागतो! ह्या सर्व बाबी सुख द्यायचे सोडाच, समाधानाच्या आडच येतात! जास्त पैशामुळे अश्या तऱ्हेने आपली अस्वस्थता वाढते. असमाधान वाढते. ह्या सर्व बाबी नियंत्रणात ठेवणे ही अत्यंत कठीण आणि कसोटीचीच बाब असते! भल्याभल्याना जास्त पैशामुळे स्वत:वर नियंत्रण ठेवणे अशक्य होते! अनेक छंद, व्यसने आणि हितशत्रू यामुळे संकटे वाढतात!
जास्त पैशामुळे आपण सहज मार्गभ्रष्ट होऊ शकतो आणि रसातळाला जाऊ शकतो!

उलट पोटापुरता पैसा मिळाला तर आपल्या वासना आणि हाव ह्यांच्यावर आणि स्वैराचारावर आपसूक बंधने येतात! सुरुवातीला ही बंधने त्रासदायक वाटली तरी, नामस्मरणाची जगोडी वाढण्यासाठी ह्या बंधनांचा आपल्याला फायदाच होतो!

म्हणूनच सद्गुरू म्हणतात तेच खरे आहे! पोटापुरता पैसा मिळणाऱ्या आपल्यातल्या बहुसंख्यांवर देवाची कृपा आहे!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (1993)  |  User Rating
Rate It


Aug21
गोंदवलेकर महाराज मला समजलेले ९. तर जीवनाचे
९. तर जीवनाचे सोने होते डॉ. श्रीनिवास कशाळीकर

श्री. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, "जगात कुठलीही गोष्ट अती केली की माती होते पण नामस्मरण ही ऐकमेव गोष्ट आहे की ती अती केले की माती नाही तर जीवनाचे सोने होते. नामामुळे परमेश्वराला तुमच्या बरोबर रहावे लागते"

मला कळलेला याचा अर्थ असा की नाम म्हणजेच ब्रह्म आणि नाम म्हणजेच भगवंत आहे. नाम आपल्या अस्तित्वाचा गाभाच आहे. त्यामुळे, नामस्मरणाने आपण आपल्या आत, आपल्या अस्तित्वाच्या गाभ्याकडे, जिथे परमेश्वराची म्हणजेच सद्गुरूंची वस्ती असते तिथे जातो! त्यामुळे नामस्मरण अती झाले तर त्यामुळे काहीही बिघडण्याचा (माती होण्याचा) प्रश्नच येत नाही! अती नामस्मरणाने फार तर आपण परमेश्वराच्या म्हणजेच सद्गुरुंच्या म्हणजेच स्वत:च्या सच्चिदानंदस्वरूपाच्या (कालातीत, अजरामर चैतन्याच्या आणि शाश्वत समाधानाच्या) अधिक निकट पोचू! तद्रूप होऊ; नाही का? पण ही तर सर्वश्रेष्ठ उपलब्धी आहे! नामस्मरण हे अमृत आहे असे जे म्हणतात ते ह्याच कारणासाठी! अमृत म्हणजे मृत्युच्या पलिकडे नेणारे, अमर करणारे. हा अनुभव आपल्याच अस्तित्वाच्या गाभ्याचा असतो, म्हणून, ह्याला कोणी आत्मानुभूती, कोणी आत्मसाक्षात्कार. तर कोणी आत्मज्ञान म्हणतात. मर्त्य जीवनाच्या कोंडवाड्यातून वा तुरुंगातून सुटका होऊन अमर अस्तित्वाचे स्वातंत्र्य मिळते म्हणून कोणी ह्यालाच खरे स्वातंत्र्य, कोणी मोक्ष, तर कोणी मुक्ती म्हणतात. सगुण भक्ती करणारे भक्त ह्याच अनुभवाला भगवंताचे दर्शन म्हणत असल्यामुळे, ह्याच अलौकिक अनुभवाचे वर्णन; सद्गुरू, "परमेश्वराला तुमच्या जवळ राहावे लागते" असे करतात.

त्याचप्रमाणे, ह्या एका परीने अत्यंत आतल्या आणि अत्यंत खाजगी अश्या अनुभवातच आपले, आपल्या कुटुंबाचे आणि संपूर्ण विश्वाचेही शाश्वत कल्याण असते. कारण नाम घेणारी व्यक्ती, तिची इच्छा असो वा नसो, कधीही स्वत:चे संकुचित कल्याण साधू शकत नाही. म्हणून, असे सार्वत्रिक कल्याण नामस्मरणात असल्याने, ह्यालाच "जीवनाचे सोने होते" असे सद्गुरू म्हणतात! वाचन लेखनाने; नामस्मरण करण्याचा आपला निर्धार बळकट होऊ शकतो, पण केवळ तेवढा पुरत नाही! सद्गुरुंच्या सांगण्याचा प्रत्यक्ष अनुभव सतत नामस्मरण केल्यानेच येऊ शकतो!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (1844)  |  User Rating
Rate It


Aug21
गोंदवलेकर महाराज मला समजलेले : ८ आपली वृत्त
८. आपली वृत्ति सारखी बदलत आहे डॉ. श्रीनिवास कशाळीकर

श्री. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, “आपली वृत्ति सारखी बदलत आहे आणि जगही सारखे बदलत आहे. त्यामुळे अमुक परिस्थितीमुळे सुख आणि अमुक परिस्थितीमुळे दु:ख होते हे वाटणे खरे नव्हे. कारण ते सुखदु:ख अस्थिर असते.”

ह्या शिकवणीचे महत्व काय आहे?

आपल्याला प्रत्येक परिस्थिती ही त्या त्या वेळी कायमचीच आहे असे वाटते. त्याचप्रमाणे आपल्याला जे वाटते तेच १०० टक्के सत्य आहे असे आपल्याला वाटते. यामुळे सुख आणि दु:ख देणारी परिस्थिती आपल्या अपेक्षेच्या विपरीत बदलली की आपल्या मनाला जोरदार धक्के बसतात आणि मनाची घालमेल होते! त्यामुळे कायम आपल्या मनात एक प्रकारची हुरहूर राहते. आपल्याला, आहे त्यापेक्षा काही तरी भव्य-दिव्य आणि रोमांचक घडवावे किंवा घडावे असे वाटत असते आणि आपल्यां मनाप्रमाणे घडले नाही की आपल्याला वाईट वाटत असते. म्हणूनच समाधान मिळवण्यासाठी आपल्याला सद्गुरूंची शिकवण नीट समजून घ्यायला हवी.

आज आपल्याला जे जग दिसते ते क्षणोक्षणी बदलत असल्यामुळे आणि आपले शरीर आणि मन देखील बदलत असल्यामुळे आपले “वाटणे” देखील बदलत असते! त्याचप्रमाणे, आपल्याला जे काही बरे-वाईट वाटत असते, ते मुळात ईश्वरेच्छेने (म्हणजेच गुरुच्या इच्छेने) “वाटत” असते. तसेच, जगाला काय “वाटावे” हे देखील मुळात ईश्वरेच्छेनेच ठरत असते! आपण जे बरे-वाईट वागतो, ते ईश्वरेच्छेनेच वागतो आणि इतरांनी काय करावे, कसे करावे आणि केव्हा करावे हे देखील ईश्वरेच्छेनेच ठरत असते!
वास्तविक पाहता, आपण आणि जग; दोन्हीही आपल्या कल्पनेच्या पलिकडे, आपल्या मनाच्या वेगाहून अधिक वेगाने आणि आपल्या बुद्धीपेक्षा अधिक अचूकपणे; ईश्वरेच्छेने “सुधारत” असतात! आपण आणि आपल्या कल्पना स्थूल असल्यामुळे, आपल्याला ह्या सत्याचा म्हणजेच “राम कर्ता” ह्या सत्याचा विसर पडत असतो आणि आपण पुन्हा पुन्हा अस्वस्थ होत असतो! तडफडत असतो.

नामस्मरण करता करता हळूहळू, पण निश्चितपणे आणि अधिकाधिक स्पष्टपणे समजते की आपले आकलन, आपली मते, आपल्या कल्पना, आपली आवड आणि आपली बुद्धी ईश्वरेच्छेशी म्हणजेच सद्गुरुंच्या इच्छेशी जशी तद्रूप होत जाते तसे आपण अधिकाधिक स्वस्थ आणि समाधानी होत जातो!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (1808)  |  User Rating
Rate It


Aug21
गोंदवलेकर महाराज मला समजलेले: ७. ज्याची दृष
७. ज्याची दृष्टी रामरूप झाली तो खरा गुरु होय डॉ. श्रीनिवास कशाळीकर

श्री. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, “ज्याची दृष्टी रामरूप झाली तो खरा गुरु होय”

एकीकडे गुरुशिवाय ज्ञान नाही खरे; पण खरा गुरु ओळखायाचा कसा? किंवा आपल्याला आपल्या गुरुची ओळख कशी पटेल? असे म्हणतात, शिवो भूत्वा शिवं यजेत. शिव होऊन शिवाला जाणावे. साधू होऊन साधूला जाणावे. म्हणजेच एका प्रकारे दृष्टी रामरूप होण्याचा थोडातरी अनुभव आला तरच आपल्याला अंधविश्वास आणि कुत्सितपणा; दोन्हीही टाळून खरा गुरु म्हणजे काय ते ओळखता येईल आणि आपल्या गुरुची ओळख देखील आपल्याला पटेल!

पण हे शक्य आहे का? नामस्मरण करताना कोणाला कोणते अनुभव आणि केव्हां येतील हे सांगता येत नसल्यामुळे, आपल्या चिकाटीची कसोटी लागते, आणि धीर सुटू शकतो हे खरे नाही का?

हे अगदी खरे आहे. आपण सारे; पुन्हा पुन्हा नामाच्या ( चैतन्याच्या) विस्मृतीत जातो आणि विषयांकडे आकर्षित होत राहतो, त्यांच्या भूलभूलैय्यात अडकत राहतो! इंद्रियगम्य स्थूल विषय आणि दृश्य विश्वाच्या आकर्षणाचा (म्हणजेच प्रारब्धाचा) जोर इतका जबरदस्त असतो की आपली धाव आपोआप चैतन्याच्या विरुद्ध दिशेला वळते! साहजिकच आपण भलतीकडेच भरकटत जातो! परिणामी; आपली अस्वस्थता काही केल्या कमी होत नाही आणि खरं गुरु ओळखता येणे, किंवा आपल्या गुरुची ओळख पाटणे, हे आपल्यापासून दूरच राहते!

पण चिकाटीने नामस्मरण करता करता आपल्याला, हळूहळू जाणवू लागते की आपल्या इच्छे-अनिच्छेपलिकडे; विश्वचैतन्याची जननी आपली गुरुमाउली सर्व बऱ्या वाईट प्रसंगात आपल्याला सांभाळून आपल्याला चैतन्यामृतपान करवीत आहे आणि आपल्याकडून नामस्मरण आणि स्वधर्मपालन वाढत्या प्रमाणात करवीत आहे. पण एवढेच नव्हे तर, सदभिरुची, सदिच्छा, सत्संकल्प, सत्प्रेरणा, सत्बुद्धी, सद्भावना, सद्वासना, सदाचार यांनी केवळ आपले व्यक्तिगत जीवन नव्हे तर संपूर्ण सामाजिक जीवन देखील अधिकाधिक प्रमाणात भरून टाकीत आहे!

प्रत्येक बाबतीत अशी सद्गुरुची अद्भुत शक्ती आणि सत्ता जाणवणे म्हणजेच प्रत्येक बाबतीत राम दिसण्याची सुरुवात होय. अश्या तऱ्हेने, सद्गुरुंच्या सत्तेने आमच्याकडून नामस्मरण होत जाते आणि तसे होता होता “दृष्टी रामरूप होण्याचा” त्यांचा स्वत:चा अनुभव देखील काही अंशाने का असेना आपल्यालाही येऊ लागतो! गुरु ओळखता येण्याची आणि गुरुची ओळख पटण्याची ही सुरुवात नाही का?


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (1708)  |  User Rating
Rate It


Aug21
गोंदवलेकर महाराज मला समजलेले ६. सत्यवस्तू &#
६. सत्यवस्तू ओळखणे हा परमार्थ डॉ. श्रीनिवास कशाळीकर

श्री. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, “सत्यवस्तू ओळखणे हा परमार्थ, आणि असत्य वस्तूला सत्य मानून चालणे हा प्रपंच होय”.

परमार्थाची आणि प्रपंचाची इतकी चपखल व्याख्या सापडणे कठीण आहे!

खरे सांगायचे तर; आम्ही माध्यमातील मंडळींनी, काळाची दिशा ओळखायला शिकले पाहिजे. जे जे घडताना दिसते, भासते आणि गोंधळात टाकते, खिन्न करते, उद्विग्न करते, भडकवते, उद्दीपित करते किंवा भ्रष्ट करते आणि फूट पाडते त्याच्या पलिकडे सर्वांना प्रगल्भ बनवणारे आणि एकत्र आणणारे सत्य बघायला आणि ओळखायला शिकले पाहिजे!

पण आम्ही देखील सामान्यच आहोत! आमच्यातही उणीवा आहेत! आमची दृष्टीही स्वच्छ नाही! त्यामुळे समाजातले असलेले-भासलेले दोष, गुन्हे आणि अपराध यांनी आम्ही देखील विचलित होऊ शकतो, वा घाबरु शकतो हे अगदी खरे आहे! आम्हाला देखील कुत्सितपणा, निराशा, संकुचित स्वार्थ ग्रासु शकतात! प्रगल्भ विचार, उदात्त भावना एका बाजूला आणि राजकीय दबाव, प्रलोभने, भपका आणि झगमगाट दुसऱ्या बाजूला अश्या रस्सीखेचीमध्ये आम्ही देखील गोंधळू आणि बहकू शकतो आणि भरकटू शकतो हे अगदी खरे आहे! विशेष म्हणजे, यामुळे आमचे आकलन सदोष बनून आम्ही; स्वत:सकट इतरांना देखील आमच्या आकलनाचे बळी बनवू शकतो!

पण या कोंडीतून बाहेर कसे पडायचे? ही घुसमट आणि ही तडफड कशी थांबवायची यावर उपाय शोधला तरी सापडत नव्हता!

परंतु यादरम्यान सद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री. गोंदवलेकर महाराजांचे प्रा. के. वि. बेलसरे यांनी लिहिलेले चरित्र वाचनात आले. त्यामध्ये सबजज्ज फडके यांच्याबरोबर झालेल्या संवादामधून सुधारणा आणि संस्कृती म्हणजे काय याचे थोडेफार आकलन झाले आणि डोळ्यात जणू काही अंजनच पडले!
ज्याप्रमाणे रस्त्यावरचे खड्डे प्रवास दुष्कर करतात, त्याचप्रमाणे आपली देहबुद्धी सत्याकडे चाललेला आपला प्रवास अवरुद्ध करून आपल्याला भ्रमात बांधून ठेवते. यामुळे ईश्वराकडे, सद्गुरुंकडे, आपल्या खऱ्या “मी” कडे म्हणजेच शाश्वत समाधानाकडे पोचणे जिकीरीचे आणि दुस्तर होते. रस्त्यावरचे खड्डे बुजवले की जसा प्रवास सुरळीत होतो, त्याप्रमाणे नामस्मरणामुळे सद्बुद्धी, सद्भावना, सद्वासना आणि सत्कार्य ही सर्व “रस्तादुरुस्तीची यंत्रे” झपाट्याने कार्यरत होतात आणि शाश्वत समाधानाचा रस्ता दुरुस्त आणि प्रशस्त होतो हे पक्के ध्यानात आले!

त्यामुळे, स्वत:ची दृष्टी साफ होण्यासाठी आणि लोकांच्या पर्यंत सर्वांना प्रगल्भ बनवणारे आणि एकत्र आणणारे सत्य पोचवण्याचे स्वत:चे कर्तव्य समाधानकारकपणे पार पाडण्यासाठी आम्ही माध्यमवाल्यांनी; नामस्मरणाचा अत्यंत आस्थेने अभ्यास, अगत्यपूर्वक अंगिकार आणि जीव तोडून प्रसार केला पाहिजे ह्याची खोलवर आणि तीव्र जाणीव झाली!
ही जाणीव म्हणजे आपल्या सर्वांच्या कल्याणाची नांदीच आहे!!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (1775)  |  User Rating
Rate It


Aug21
गोंदवलेकर महाराज मला समजलेले: ५. स्मरण ही कृ
५. स्मरण ही कृती आहे : डॉ. श्रीनिवास कशाळीकर

श्री. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, “स्मरण ही कृती आहे. विस्मरण ही वृत्ति आहे.”

कृती आणि वृत्ति यात काय फरक आहे?

वृत्ति ही अनवधानाने आपल्या नकळत आतून उसळत असते. कृती ही जाणूनबुजून कळून सवरून केलेली असते. वृत्तिचा ओघ “खाली” असतो. कृतीची ओढ “वर” असते. वृत्तीचा प्रवाह उलट फिरवणारी ती कृती!

रोजच्या जीवनात डोकावले तर दोन्हीतला फरक आणखी स्पष्ट होऊ शकतो.

आपले आई वडील, आपली पत्नी, आपला पती, आपली मुले, आपली नातवंडे, आपले मित्र-मैत्रिणी, आपले शिक्षक, आपले डॉक्टर, आपले विद्यार्थी; सर्व जण स्वस्थ असावी असे आपल्याला वाटते ना? म्हणजेच आपल्या अवती-भोवती प्रसन्न वातावरण असावे असे वाटते ना? पण आपली शारीरिक क्षमता, आपली आर्थिक कुवत, आपली सामाजिक प्रतिष्ठा, आपले राजकीय वजन इत्यादी कमी कमी होत चालल्या की, आपण आता निकामी झालो असे वाटू लागते. ह्या जांणीवेने आपण असहाय्य आणि खिन्न होत जातो! आपले आप्त आणि स्वकीय जर दूर राहात असले तर आपल्याला हे अधिकच जाणवते आणि आपले स्वास्थ्य दूर जाते! प्रसन्नता दूर जाते! नकळत नामस्मरण विसरले जाते! हे नामविस्मरण ही वृत्ति!

आपले आई-वडील, आपले मित्र-मैत्रिणी, आपली पत्नी, आपला पती, आपली मुले, आपली नातवंडे, आपले शिक्षक, आपले डॉक्टर, आपले विद्यार्थी; थोडक्यात सर्व जण स्वस्थ व्हावे यासाठी अगदी असहाय्य अवस्थेत देखील वृत्ति पालटण्याचे व उलट फिरवणारी कृती म्हणजे नामस्मरण!

हे साधन सहजा सहजी पटत आणि रुचत नाही. कारण, आपण इतरांच्यासाठी काही करू शकतो हा सुप्तपणे मनात असलेला कर्तेपणाचा भाव! हा असला मोठेपणा; नामस्मरण करून गोंजारला जात नाही! तसेच तो मिरवता येत नाही. कारण, नामस्मरण करीत असताना आपण इतरांच्यासाठी सोडाच, स्वत:साठी देखील काही करत असल्याचे स्वत:लाही सहजासहजी जाणवत नाही आणि इतरांनाही दाखवता येत नाही!

पण नामस्मरणाच्या कृतिनेच आपली वृत्ति पालटू लागते! ह्या कृतीनेच आपला उर्ध्वगामी प्रवास सुरु होतो! ह्या कृतीनेच आपल्या सर्वांच्या हृदयातील ईश्वर प्रगट होण्याचा म्हणजेच जीवनामध्ये खऱ्या स्वास्थ्याचा वसंत अंतर्बाह्य फुलण्याचा मार्ग मोकळा होतो!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (1603)  |  User Rating
Rate It


Aug21
गोंदवलेकर महाराज मला समजलेले: ४. संतांची वृ&
४. संतांची वृत्ती राममयच असते: डॉ. श्रीनिवास कशाळीकर

श्री. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात,”जो जो कोणी मला भेटला तो तो मी आपलाच मानला” आणि “संतांची वृत्ती राममयच असते, त्यांना सर्वत्र रामच दिसतो”!

आमची वृत्ती कशी असते? नकळत मनात तुलना होताना मनामध्ये आमच्या सहिष्णुतेचा विचार येतो. खरे तर सहिष्णुता हा शब्द आपण आपण पुष्कळदा वाचतो वा ऐकतो. पण खरी सहिष्णुता म्हणजे नेमके काय? याचा विचार करता लक्षात येते की सहिष्णुता ही वाटते तितकी साधीसुधी बाब नाही! तिला अनेक पदर आहेत!

अंतर्बाह्य ईश्वर असताना त्याचा पूर्ण विसर पडणे (त्यामुळे त्याविषयी टिंगल टवाळीची भावना असणे) आणि त्यामुळे, अंतर्बाह्य पसरलेल्या वासनाविवशतेला विरोध तर नाहीच पण तिचे (हीन स्वार्थाचे) उद्दंड आणि बेभान समर्थन करणे ही सकृद्दर्शनी सहिष्णुता वाटली तरी ती सहिष्णुता नसून स्वत:च्या आणि इतरांच्या अंतरात्म्याशी केलेली घोर प्रतारणा असते. ही सहिष्णुतेच्या प्रवासाताली पहिली पायरी.

वासना आणि ध्येय यांच्यात संघर्ष होऊन सारखी ओढाताण होणे आणि वासनेमध्ये पुन्हा पुन्हा नाईलाजाने ओढले जाणे व वाहात जाणे व आपल्या आतल्या आणि बाह्य जगातील वासनेविषयी चीड येणे ही सकृद्दर्शनी असहिष्णुता वाटली तरी ती असहिष्णुता नसून, स्वत:च्या आणि इतरांच्या अंतरात्म्याशी सहिष्णू बनण्याची प्रामाणिक धडपड असते. ही सहिष्णुतेच्या प्रवासाताली दुसरी पायरी.

नामाची निष्ठा भक्कम होता होता नामाच्या ओढीने अस्वस्थता, आतुरता व तळमळ निर्माण होणे आणि अंतर्बाह्य व्यापणाऱ्या वासनांचे आघात आणि पकड ढिली होणे, तसेच अंतर्बाह्य पसरलेल्या वासनेचे पर्यवसान वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी आणि वेगवेगळ्या काळानुसार पण निश्चीतपणे नामाच्या ओढीत आणि गोडीत होते ह्या अंतर्बाह्य परिवर्तनाची विजयी अनुभूती येणे आणि शाश्वत समाधान आणि सार्थकता याची जाणीव ठळक होऊन; नामाचा आग्रह, हेका, हट्ट आणि वासनेचा तिरस्कार व तिटकारा हळु हळु निघून जाणे ही सहिष्णुतेच्या प्रवासाताली तिसरी पायरी.

आणि याच्या पलीकडे सहिष्णुतेच्या प्रवासाची चवथी पायरी असते. ह्या शब्दातीत पायरीवर संत असतात. ह्या सहिष्णुतेचे महत्व असे की ती केवळ शाब्दिक सहिष्णुता नसून प्रत्यक्ष विश्वकल्याण साधणारी संजीवक अमृतौषधी असते! ही खरी पराकोटीची सहिष्णुता!

आपल्यापुरते असे म्हणता येईल की, प्रत्येकाला पूर्णत्वाची आंस असते, पण ती ओळखता येतेच असे नाही. तसेच शब्दात सांगता बोलता येतेच असे नाही. त्याचप्रमाणे ती आंस तृप्त करण्याचे साधन माहीत असतेच असे नाही. एवढेच नव्हे तर ते साधन कळले तरी त्या साधन मार्गावर चालता येतेच असेही नाही. आणि अखेर साधन मार्गावर चालू लागला तरी अखेरपर्यंत चिकाटीने चालत राहणे जमतेच असे नाही!

आपलेही जर असेच असते, तर अमक्याने असे वागावे, तमक्याने तसे वागावे असा हट्ट किंवा अट्टाहास धरणे; म्हणजेच कुणाहीबद्दल असहिष्णू असणे नाही का? आपल्या मनाप्रमाणे कुणी वागत नाही असे दिसल्यावर आपण त्याच्यावर नाराज होतो आणि त्याच्याविषयीच्या कर्तव्यात कसूर करतो! हे कितपत योग्य आहे? नाही ना?

पण आपली ही असहिष्णुता झटकून कशी टाकायची? आपण सहिष्णू बनून आपले कर्तव्य कसे पार पाडायचे?

सद्गुरुंच्या शिकवणीप्रमाणे आपली पूर्णत्वाची वाटचाल चालू ठेवणे म्हणजेच नामस्मरण चालू ठेवणे आणि जमेल तसे ते वाढवीत राहणे हाच सहिष्णू होण्याचा; म्हणजेच स्वत:च्या आणि इतरांच्या प्रती असलेले हट्ट आणि अट्टाहास कमी करत नेण्याचा आणि त्याचबरोबर, आपले सर्वाधिक महत्वाचे कर्तव्य चोखपणे पार पाडण्याचा रामबाण उपाय आहे!
असे करता करता आपली तुलनेने कमी महत्वाची इतरही कर्तव्ये (निरपेक्ष भावनेने केलेली कर्मे) देखील (ज्यांमध्ये आम्ही असहिष्णुतेमुळे कमी पडतो, ती) आपोआपच आणि पूर्वीपेक्षा अधिक आत्मीयतेने आणि आस्थेने पार पाडली जातात!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (1584)  |  User Rating
Rate It


Aug21
गोंदवलेकर महाराज मला समजलेले: ३. आंधळ्याने &
३. आंधळ्याने पाणी भरावे तसे नाम घ्यावे :डॉ. श्रीनिवास कशाळीकर

श्री. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, "आंधळ्याने पाणी भरावे तसे नाम घ्यावे. भांडे भरले किती आणि रिकामे किती, हे त्याला समजत नाही. तो भरतच राहतो. तसे नाम सतत घेत राहावे. देहाच्या कणाकणातून नामाचा ध्वनी केव्हाही यावा इतके नाम घ्यावे. सुरुवातीला रामनाम असे मुरले की पुन्हा जास्त लक्ष द्यावे लागत नाही. आपोआप देहाचे सारे कण नामजप करतात."

हे अगदी साधे व सहज सांगणे किती पराकोटीचे सत्य आहे याची सहजासहजी कल्पना येत नाही!

स्वत:ला आंधळे समजणे फारच नकोसे वाटते! अहंकार आड येतो! शिवाय, रोजच्या व्यवहारातल्या अनुभवाप्रमाणे अमुक किंमत दिली की अमुक वस्तू मिळते तशी अमुक एवढे नाम घेतले की अमुक परिणाम दिसला पाहिजे असे आतून वाटत असते. आपले नाही तर नाही, किमान, समाजात तरी फरक पडावा आणि पडेल असेल असे वाटत असते! पण ते जेव्हां घडत नाही, तेव्हां विश्वास डळमळू लागतो!

पण म्हणूनच आमच्या कल्याणासाठी सद्गुरुनी हे सांगितले आहे!
खोलात जाऊन नीट विचार केला तर हळूहळू लक्षात येते की; आमच्या सद्गुरुंचाच अनुग्रह आम्हाला का आणि कसा मिळाला, विशिष्ट देशातच आणि विशिष्ट आई-वडिलांच्या पोटीच आमचा जन्म का आणि कसा झाला, काही विशिष्ट व्यक्तीच आमच्या कुटुंबीय का आणि कश्या झाल्या; अश्या अनेक बाबींची कारणे दिसत नाहीत! भिंतीच्या पलिकडे काय चाललेय हे “दिसत” नाही! समोरच्या व्यक्तीच्या मनातले “दिसत” नाही! एवढे कशाला, आमच्या स्वत:च्या शरीराच्या आणि मनाच्या कोनाकोपऱ्यात केव्हां केव्हां, काय काय घडले आता काय चाललेय आणि पुढच्या क्षणी काय होणार हे देखील आम्हाला “दिसत” नाही! शिवाय हे का घडले, कसे घडले किंवा का होणार आणि कसे होणार ह्यातले काहीही दिसत नाही!

मग आम्ही “आंधळे”च नव्हे काय?

आता आमच्याकडून घडणाऱ्या नामस्मरणाचा विचार करू! आपल्या नामस्मरणामध्ये; क्षणोक्षणी इतर विचार, इच्छा, आशा, निराशा, मत्सर, द्वेष, राग, लोभ, चिंता, तिरस्कार, काळजी, खिन्नता इत्यादी कोणत्या भावना, किती तीव्रपणे उत्पन्न होतात, कोणत्या वासना उत्पन्न होतात आणि कोणत्या थरातून उद्भवतात, हे सारे; आम्हाला दिसते का? नाही! आमची जपसंख्या मोजताना आणि नोंदताना आम्ही हे सारे हिशेबात घेऊ शकतो का? नाही!

मग आम्ही “आंधळे”च नव्हे काय?

साहजिकच, आमचे नामस्मरण किती झाले आणि आमचे मन किती शुद्ध झाले हे आम्हाला कळू शकते का? नाही! मग, “आमचे नामस्मरण एवढे झाले तरीआम्हाला अजून अनुभव कसा नाही?” असे म्हणणे योग्य होईल का? अर्थातच नाही ना?

म्हणूनच आम्ही सद्गुरूंची वरील शिकवण अत्यंत नम्रपणे आणि सर्वस्व झोकून देऊन आचरणात आणण्याचा जीवापाड प्रयत्न नको का करायला?


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (1506)  |  User Rating
Rate It


Aug21
गोंदवलेकर महाराज मला समजलेले: २. आपल्याला ह&
२. आपल्याला हव्या त्या गोष्टी डॉ. श्रीनिवास कशाळीकर

श्री. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, “आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नसून, असेल त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकणे ही त्याची खरी कृपा होय.”

सुरुवातीला हे आपल्याला पटत नाही!

कारण?

कारण, आहे ती परिस्थिती स्वीकारणे त्यात समाधान मानणे म्हणजे पराभव स्वीकारणे असेच आपल्याला वाटत असते! साहजिकच, हे आपल्याला क्लेशकारक आणि असह्य होते. जगामध्ये व आपल्या जीवनात काय व कसे असावे (उदा. राज्यव्यवस्था, समाजव्यवस्था, अर्थव्यवस्था इत्यादी आणि आपला व्यवसाय, घरदार, कटुंब, आर्थिक स्थिती इत्यादी) याबाबतच्या, अर्थात हवे-नको पणाच्या कल्पना, वासना आणि ओढ यामुळे आपण कायम अस्वस्थ असतो. असंतुष्ट असतो. किंबहुना तसे राहाणे आपल्याला संवेदनाशील आणि योग्य वाटते!

पण जगामध्ये असो, वां वैयक्तिक जीवनात अनेकदा, आपल्याला हव्या त्या गोष्टी घडल्याने वा मिळाल्याने; कालांतराने मनाला जेव्हां टोचणी लागल्याचा अनुभव येतो आणि अनेकदा, आपल्याला हव्याश्या वाटणाऱ्या अनेक बाबी न घडल्याने वा न मिळाल्याने पुढे जेव्हा “हायसे” वाटल्याचा अर्थात समाधान झाल्याचा अनुभव येतो, तेव्हा नाईलाजाने आणि मोठ्या मुश्किलीने आपला अहंकार विरघळू लागतो आणि “आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नाही” हे पटू लागते आणि मनात ठसु लागते!

जगामध्ये असो, वा वैयक्तिक जीवनात: “आपल्याला हव्या” वाटणाऱ्या गोष्टी; वास्तविक पाहता, आपण आपल्या अहंकारापोटी जोपासलेल्या असतात, आपल्या अंतरंगाला हव्या की नको याचा विचार देखील न करता! म्हणूनच त्यांच्यासाठी स्वत:ला वा इतरांना कळत-नकळत पीडा देणे, किंवा त्या न मिळाल्याने मन मारून हताश होणे, ह्यामुळे वैयक्तिक आणि सामाजिक तणावाचे दुष्टचक्र प्रभावशाली बनत जाते!

प्रत्येक प्रसंगी मनात असो वा नसो, नामस्मरण आचरणात येत जाते तसे तसे, ईश्वरी सत्तेचे म्हणजेच सद्गुरुंच्या सत्तेचे नि:पक्षपाती, अचूक, अखंड, अविरत आणि आपल्या अंतरंगाला समाधान देणारे नियंत्रक कार्य ध्यानात येऊ लागते! घडणारे सर्व काही ईश्वरेच्छेने म्हणजेच आपल्या सद्गुरुंच्या इच्छेने; आणि आपल्या कल्याणासाठीच होत आहे ही आश्वासक जाणीव जेव्हां आपल्याला हव्याश्या वा नकोश्या प्रत्येक प्रसंगात मायेची सावली आणि धीराचा हात देत राहते, तेव्हां सुख दु:खाचे तडाखे मुलायम बनत जातात! साहजिकच मग; असेल त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकणे ही भगवंताची खरी कृपा होय हे पटते आणि अनुभवाला येते!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (1536)  |  User Rating
Rate It


Aug21
गोंदवलेकर महाराज मला समजलेले: १. आपण कसे वाग
१. आपण कसे वागावे डॉ. श्रीनिवास कशाळीकर

श्री. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, “संत सांगतात तसे आपण वागावे. ते वागतात तसे नये वागू!”

संत किंवा आपले सद्गुरू जसे वागताना दिसतात, त्याच्या कितीतरी वेगळे आणि विलक्षण आणि आपल्या कल्पनेच्या अतीत असे त्यांचे अंतरंग असतात आणि ते असल्याशिवाय तसे वागणे म्हणजे वाघाचे कातडे पांघरून वाघाप्रमाणे मिरवणे! अर्थात त्यामुळे फजितीच फजिती होऊ शकते!

आपण कसे असावे आणि कसे वागावे ह्याबद्दल अनेक मते आहेत. आपल्यालाही; पुस्तके, नियतकालिके वा वृत्तपत्रे वाचून; चित्रपट, नाटके पाहून; कीर्तने, निरुपणे आणि कथा ऐकून आणि आजूबाजूला पाहून अनेकदा अनेक विचार आणि उर्मि येतात.

पण कसेही होण्याचा किंवा कसेही वागण्याचा प्रयत्न केला किंवा आपण कसेही झालो आणि कसेही वागलो तरी ते वेषांतर केल्याप्रमाणे केवळ बाह्यस्वरूप बदलणे असल्यामुळे आपले समाधान होत नाही!

फक्त आपल्या सद्गुरुना म्हणजेच आपल्या अंतरात्म्याला जे आवडते, तसे होण्याचे वा वागण्याचे प्रयत्नच आपल्याला समाधानाच्या मार्गावर नेतात! त्यामुळे तेच श्रेयस्कर आहेत! म्हणूनच संत म्हणजेच आपले सद्गुरू सांगतात तसे वागावे. ते वागतात तसे नये वागू हे अक्षरश: खरे आहे!

पण असे प्रयत्न करायचे म्हणजे काय?

सर्व मते आणि मतांतरे बाजूला ठेवून; त्यांनी सांगितल्याप्रमाणे नामस्मरण सुरु करणे, करीत राहणे, ते वाढवण्याचा प्रयत्न करणे; आणि दरम्यान; आपल्याला कळलेली आणि अनुभवाला आलेली नामस्मरणाची महती इतराना सांगण्याचा प्रयत्न करणे; हेच ते प्रयत्न! ह्या प्रयत्नांनीच आपले अधिकाधिक समाधान होत जाते आणि त्या अनुरोधाने आपले बाह्य स्वरूप आकाराला येते आणि आपली व्यवहारातील वागणूक देखील आपोआपच योग्य प्रकारे विकसित होते!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (1539)  |  User Rating
Rate It


Browse Archive