World's first medical networking and resource portal

Dr. Shriniwas Kashalikar's Profile
Special Message:
Over 170 videos, 45 books and 500 articles in Englsh, Hindi and Marathi are available for free download on www.youtube.com/superliving08 and
www.freestress.webs.com
www.slideshare.net/drsuperliving
VOTES0000070
PAGE HITS0074715

गोंदवलेकर महाराज म्हणतात “सद्गुरू म्हणजे 
गोंदवलेकर महाराज म्हणतात “सद्गुरू म्हणजे मूर्तिमंत नामच”.डॉ. श्रीनिवास कशाळीकर

श्री. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, “नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे” आणि “सद्गुरू म्हणजे मूर्तिमंत नामच”. याचा अर्थ नामस्मरण हीच जीवनातली सर्वोच्च कृती! कारण सद्गुरूची भेट आणि सद्गुरूचे प्रेम हेच जीवनात मिळवायचे असते.

आजारपणात जीवन संपत आले की; ऐहिक यशाने समाधान झालेले नसल्यामुळे, इतर काय करतात आणि इतरांनी काय मिळवले, ह्या भ्रमात आपण गुरफटतो. अश्या वेळी इतरांच्या (आणि आपल्याही) मागची नामाची सत्ता आपण विसरतो आणि नामाचे सर्वोच्च महत्व देखील विसरतो. जीवन व्यर्थ गेले असे वाटते! नकळत आपण नामाचा आणि सद्गुरुंचा अनादर करतो!

नाम म्हणजेच सद्गुरू आणि नामावर प्रेम करणे म्हणजे सद्गुरूंवर प्रेम करणे असल्यामुळे नामस्मरणाएवढे श्रेष्ठ दुसरे कांहीही नाही. नामाशिवाय काहीही मिळवायचे नाही. नाम घेतांना मृत्यू आला तर ते खरे सर्वश्रेष्ठ भाग्य; कारण तीच गुरुभेट, तेच जीवनाचे सार्थक आणि तेच सर्वश्रेष्ठ साफल्य!

म्हणूनच आत्यंतिक वेदना, हतबलता आणि मृत्यूसमयीसुद्धा नामाचा विसर पडू नये हीच सद्गुरुचरणी कळकळीची प्रार्थना.

Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views ( 5670 )  |  User Rating
Rate It

गोंदवलेकर महाराज मला समजलेले १७. प्रपंच हे
१७. प्रपंच हे साधन आहे, परमार्थ हे साध्य आहे डॉ. श्रीनिवास कशाळीकर

श्री. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, “प्रपंच हे साधन आहे, परमार्थ हे साध्य आहे”.
लहानपणी साधन आणि साध्य ह्यामध्ये घोळ होतो हे खरे, पण मोठेपणी देखील समजुतीमध्ये जरी नाही तरी पण वागण्यात मात्र गोंधळ होतो!

नामस्मरणाचा अभ्यास करताना एकदम काही आपल्याला आत्मज्ञान होत नाही. आपण सामान्यच असतो. आतील आणि बाहेरील जगाचे आपल्यावर बरे-वाईट परिणाम होतच असतात. त्यामुळे आपली माफक अपेक्षा असते की; सरकारने अश्या योजना आखाव्या, अशी धोरणे राबवावी, असे कायदे आणि नियम करावे की ज्यांचे पालन करताना आपल्या सदसद्विवेक बुद्धीचा कोंडमारा होणार नाही, आपले जगणे मुश्कील होणार नाही आणि असहाय्य होणार नाही! कारण तसे झाले की कायदे मोडावे लागतात किंवा कायद्यामधून पळवाटा काढाव्या लागतात. मनात असो वा नसो अशी चोरी करावी लागते. मग कायद्याने शिक्षा मिळण्याची जशी भीती असते तशीच स्वत:चे मन देखील स्वत:ला खात असते.

उलट, हे कायदे जर सुयोग्य असले, तर ते पाळल्यामुळे आपल्या अंतरात्म्याचे समाधान होत राहील आणि जीवनाची कृतकृत्त्यता, कृतार्थता आणि सार्थकता झाल्याची जाणीव आपल्याला होत राहील!
पण असे घडताना दिसत नाही! कायदे पाळताना (ते अन्याय्य असल्यामुळे) आणि मोडताना (भीतीमुळे वा मन खात असल्यामुळे) दोन्ही प्रसंगी आपल्या आतल्या आत संघर्ष चालूच राहतो. काय करावे हे आपल्याला सुचत नाही! आपण खिन्न होतो. असहाय्य होतो.

नाम आणि नामस्मरण यांची तोंडओळख झाली की, नकळत आपल्या संकुचित बुद्धीनुसार आपल्या मनात त्याविषयी अवास्तव कल्पना तयार होतात. नामाची सत्ता बलवत्तर आहे असे ऐकल्यामुळे; नामस्मरणाने सर्व परिस्थिती बदलेल ही आशा पल्लवित होते! नामस्मरणाने आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक अश्या सर्वच कल्पना आणि अपेक्षा पूर्ण होतील असे आपल्याला वाटू लागते.

त्याप्रमाणे; परिस्थिती बदलण्यासाठी आपण अधिक जोर देऊन नामस्मरण करू लागतो. असे करताना अनवधानाने आपण नामस्मरणाला (भगवंताला) साधन बनवतो आणि आपल्या कल्पनेतल्या कौटुंबिक व सामाजिक प्रपंचाला साध्य! मग कुटुंबात वा समाजात मनासारखे घडले नाही की निराश होतो!
पण आपली वैयक्तिक आणि सामाजिक परिस्थिती कशीही असली तरी हताश न होता आणि खचून न जाता; आपण आपल्या सद्गुरूंचे, श्री. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे वचन, पुन्हा पुन्हा लक्षात आणून आहे त्या परिस्थितीचा (प्रपंचाचा) उपयोग परमेश्वर प्राप्ती साध्य करण्यासाठी केला तर असहाय्यता नक्कीच कमी होते.

थोडक्यात सांगायचे तर, चिकाटीने नामस्मरण करीत गेले, की कालांतराने समजू लागते, की वैयक्तिक आणि सामाजिक जीवनातील सारे काही आपल्या मनाप्रमाणे नाही, तर प्रारब्धाच्या नियमांनुसार, पण नामाच्या सत्तेनेच घडत असते! तसेच हे देखील कळू लागते की सरकार सरकार असे ज्याला आपण म्हणतो, ते सरकार देखील कालमहात्म्यानुसार खरे, पण नामाच्या सत्तेखालीच वावरत असते!
नामाच्या सत्तेनेच आपल्या कळत-नकळत; अगदी तंतोतंत आपल्या मनाप्रमाणे जरी नाही तरी श्री. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांना अभिप्रेत असलेल्या संस्कृती आणि सुधारणा; आपल्या व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनात अधिकाधिक प्रमाणात आविष्कृत होत असतात! सदभिरुची, सदिच्छा, सत्संकल्प, सत्प्रेरणा, सत्बुद्धी, सद्भावना, सद्वासना, सदाचार; वेगवेगळ्या स्वरूपात प्रत्यक्षात येत असतात.

अश्या तऱ्हेने; नामस्मरण करता करता नामाचे गोडी वाढते. नामातील शक्ती जाणवते. अलगद आपल्या कल्पना, आपल्या अपेक्षा आणि आपल्या आवडी निवडी बाजूला पडतात.
नामच धरून राहिले की, नामाच्या इच्छेनुसार आपण स्वत: आणि जग दोन्हीही नामाच्या सत्तेने आणि सुयोग्य पद्धतीने बदलतात; याचा प्रत्यय घेऊ लागतो. मग नामासाठीच नाम घेऊ लागल्यावर नाम साध्य व प्रपंच साधन आहे हे नुसते पटत नाही, तर साधनरूप प्रपंचामागे होणारी आपली फरफट कमी कमी होत जाते. नामासाठी आणि नाम (परमार्थ) हे साध्य म्हणून आहे ती परिस्थिती (प्रपंच) साधन म्हणून वापरून नामस्मरण करणे हेच आपल्या सर्वांच्या कल्याणाचे आहे ह्याची खात्री पटत जाते!

Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views ( 5664 )  |  User Rating
Rate It

गोंदवलेकर महाराज मला समजलेले १६. भवसागरात&#
१६. भवसागरातून तरुण जाण्यासाठी भगवंताचे नाम आहे डॉ. श्रीनिवास कशाळीकर

श्री. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, “मनुष्यप्राणी भवसागरात गटांगळ्या खातो आहे; समुद्रातून तरुन जाण्यासाठी जशी नाव, तसे भवसागरातून तरुण जाण्यासाठी भगवंताचे नाम आहे”.

भवसागर म्हणजे काय?

पूर्वी भवसागर ही एक कपोलकल्पित बाब वाटत असे. कुठला भवसागर आणि कसचं काय? असं वाटत असे. पण आपला देह आणि मन हे खरोखरच महासागराप्रमाणे अथांग आहेत! आपल्या देहातल्या आणि मनातल्या असंख्य गुंतागुंतीच्या आणि वेगाने घडणाऱ्या आणि भंडावून सोडणाऱ्या घडामोडी खरोखरच वादळाप्रमाणे आहेत. परस्परविरोधी वासना, भावना, विचार आणि त्यांमधला गोंधळ हे नाकातोंडात जाणाऱ्या पाण्याप्रमाणे आहेत. जीव गुदमरून टाकणाऱ्या आहेत. त्यामुळे मनुष्यप्राणी भवसागरात गटांगळ्या खातो आहे हे अक्षरश: खरे आहे.

भवसागरात गुदमरून बुडताना तरुन जाणे अत्यंत महत्वाचे असते. कारण त्याशिवाय आत्मज्ञानाचा प्राणवायू मिळू शकत नाही! आत्मज्ञान म्हणजेच भक्ती. आत्मज्ञान म्हणजेच शाश्वत समाधान. ह्यालाच गुरुभेट म्हणतात. प्राणवायूशिवाय प्राणी जसा तळमळतो, त्याचप्रमाणे आत्मज्ञान, भक्ती, शाश्वत समाधान म्हणजेच गुरुभेटीच्या अनुभवाशिवाय साधक तळमळतो.

म्हणून समुद्रातून तरुन जाण्यासाठी जशी नाव तसे भवसागरातून तरुन जाण्यासाठी भगवंताचे नाम आहे, हे देखील शब्दश: खरे आहे. कारण अश्या तऱ्हेने तरुनच साधकाला त्याची तळमळ शांत करणारा आत्मज्ञानाचा प्राणवायू मिळू शकतो. समुद्रातून बाहेर येताना माणूस नाव मागे सोडतो. पण भवसागरातून बाहेर येताना साधक मात्र नामरुपी नाव आपल्याबरोबरच घेतो. किंबहुना तो नाममयच होतो!

सर्व महान संतांनी आणि आपल्या सद्गुरुनी कोणतीही पूर्व अट न ठेवता नामस्मरणाची भक्कम नौका आपल्यासाठी खुली केली आहे! त्यामुळे, आपण कितीही पतित असलो तरी धास्तावून जाता कामा नये. आजूबाजूच्या आप्त- स्वकीयांनी कळत नकळत त्यांच्या देहबुद्धीपायी नामस्मरणाला नावे ठेवली, आपल्याला दुषणे दिली, आपला पाणउतारा केला, अडचणी दाखवून नाउमेद केले, ज्ञान व कर्मकांडाचा बाऊ करून भीती घातली; तरी आपल्या देहबुद्धीपायी आपण विचलित होता कामा नये. नाउमेद होता कामा नये. नामस्मरण सोडता कामा नये.

आपण कितीही दुबळे असलो, कितीही पतित असलो आणि वादळे कितीही भीषण आणि रौद्र असली तरी धीर सोडता नये! सद्गुरुकृपेने मिळालेली नामाची अतिभक्कम आणि सुरक्षित नौका; चिकाटीने नामस्मरण करीत कोणत्याही परिस्थितीत सोडता कामा नये! नामस्मरणाच्या ह्या नौकेतूनच आपण शाश्वत समाधानाच्या पैलतीराला नक्की पोचू!

Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views ( 5632 )  |  User Rating
Rate It

गोंदवलेकर महाराज मला समजलेले १५. देहबुद्ध&
१५. देहबुद्धी जोपर्यंत आहे तोपर्यंत नामाचे महत्व कळणार नाही: डॉ. श्रीनिवास कशाळीकर

श्री. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, “देहबुद्धी जोपर्यंत आहे तोपर्यंत नामाचे महत्व कळणार नाही. आपला उद्धार व्हावा असे वाटत असेल तर नामस्मरण सोडू नये”.

देहबुद्धी म्हणजे स्वत:ला देहापुरते मर्यादित मानणे. किंबहुना आपण केवळ मर्त्य आणि जड असे देहच आहोत, अन्य काही नाही अशी ठाम खात्री आणि धारणा असणे! देहबुद्धीमुळेआपल्या वासना, आपल्या भावना आपले विचार आपल्या देहाभोवती फिरत असतात. आपण आपल्या मूळ सच्चिदानंद स्वरूपापासून अवनत होतो, आकुंचन पावतो आणि संकुचित बनतो. हेच संकुचित स्वार्थाचे मूळ होय. ह्यामुळे आपला दृष्टीकोन मर्यादित बनतो, बुद्धी मंद आणि स्थूल बनते, भावना अप्पलपोटी बनते आणि आपल्या वासना असमंजस आणि बेफाम बनतात. यामुळे आपला अहंकार न गोंजारणारी आणि खऱ्या अर्थाने निस्वार्थ अशी कोणतीही बाब आपल्याला तुच्छ वाटते. तिरस्करणीय वाटते. नाम हे असेच आहे. त्यामुळे नामस्मरणाचा आपल्याला तिटकारा येतो. त्यामध्ये आपल्याला गोडी वाटत नाही. ह्यामुळेच आपण आपण नामस्मरणाला नावे ठेवतो. त्याला निरुपयोगी वा प्रगतीविरोधी म्हणतो. त्याला विरोध करतो. रोगी व्यक्तीच्या जिभेची चव गेल्यामुळे तिला जसे अन्न नकोसे होते, तसे हे आहे.

वेगळ्या भाषेत सांगायचे तर, देहबुद्धी असणे म्हणजे डबक्यात राहणे. ज्याप्रमाणे, डबक्यात बसून समुद्राची कल्पना येत नाही, त्याप्रमाणे देहबुद्धी जोपर्यंत आहे तोपर्यंत नामाचे महत्व काळात नाही.

याउलट नामस्मरणाची सुरुवात होणे हे प्रत्येकाच्या अंतरंगातील सुप्त उर्ध्वगामी ओढ प्रभावी होण्याचे म्हणजेच मर्यादित अशा देहाच्या ओढीचा प्रभाव कमी होण्याचे लक्षण आहे!

नामस्मरण जसे वाढत जाते तशी देहाची ओढ आणखी कमी होते आणि नामविस्मरणाच्या डबक्यातून आपण नामस्मरणाच्या समुद्रात येतो. स्वत:ची विशालता परत मिळाल्यामुळे, नामाची महानता अधिकाधिक समजू लागते!

Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views ( 5532 )  |  User Rating
Rate It

गोंदवलेकर महाराज मला समजलेले १४. नेहमी साव
१४. नेहमी सावध असावे डॉ. श्रीनिवास कशाळीकर

श्री. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, “ मान अपमान जगतात I ते मूळ कारण झाले घातासI तेथे राहावे सावधI वृत्ति करुनिया स्थिरII”, “वृत्ति शांत होणे हाच नामाचा अनुभव आहे. नेहमी सावध असावे. आणि उर्मिच्या आहारी जाऊ नये. उर्मी आवरली पाहिजे” आणि “जेथे आळस माजला तेथे परमार्थ बुडाला”.

पण नेहमी सावध असावे हे आपल्याला नकोसे वाटते. कारण, आम्हाला सावधानता म्हणजे आमच्या आळसामध्ये व्यत्यय वाटतो! आळसापुढे आम्हाला दुसरे काहीही सुचत नाही आणि नको असते! कारण आळस आपल्या नसानसामध्ये भरलेला असतो! हाडीमांसी खिळलेला असतो! किंबहुना, आपण आळसरूपच बनलेले असतो!

पण असे असले तरी आपले आयुष्य आणि परिस्थिती तर सतत आणि वेगाने बदलत असते! काळाला आपण थांबवू शकत नाही! बदल आपण टाळू शकत नाही! उलट, आळसापायी बेसावध असल्यामुळे आपला संकुचितपणा तसाच राहिलेला असतो, “हवे-नको”पण असते, हेकेखोरपणा तसाच असतो आणि यामुळे जे आहे त्यात आम्हाला समाधान नसते! अश्या असमाधानातून तयार झालेली पोकळी आयुष्याच्या अखेर आपल्याला खायला येते! एका बाजूला आशा आणि हवे-नकोपण प्रचंड आणि दुसऱ्या बाजूला क्षमता मात्र संपलेली अशी आपली असहाय्य आणि दयनीय अवस्था झालेली असते. जेथे आळस माजला तेथे परमार्थ बुडाला म्हणजे हेच!

गुरुकृपेने सतत नामस्मरण होऊ लागले की हळु हळु आळस कमी कमी होऊ लागतो. आपण सावध होऊ लागतो. सावध राहणे आणि उर्मी आवरणे आपल्या अंगवळणी पडू लागते. ह्या सावधपणामुळे; आळसांची आवड कमी होऊ लागते. आळस आपल्या हिताच्या आड येतो आहे हे कळू लागते. आपला संकुचितपणा हाव वाढवतो हे लक्षात येउ लागते. आपला क्षुद्र अहंकार आपल्याला प्रत्येक बाबतीत तक्रार करायला भाग पाडतो आहे हे ध्यानी येऊ लागते! अधिकाधिक प्रसंगांमध्ये आपल्याला स्वत:चे अकर्तेपण आणि रामाचे कर्तेपण जाणवू लागते. ह्या जाणीवेमुळे आयुष्यात येणाऱ्या अप्रिय प्रसंगांमध्ये, संकटांमध्ये, नुकसानीमध्ये; स्वत:ला, इतरांना आणि परिस्थितीला दोष देण्यापूर्वी आपल्याला “राम कर्ता” ह्याची आठवण होते आणि आपले समाधान भंगणे कमी होते!

ह्यामुळे आहे त्या परिस्थितीत आपले नामस्मरण टिकू लागते आणि वाढू लागते! आश्चर्याची बाब म्हणजे आपल्या लक्षात येऊ लागते की हीच ती स्थिती जिच्यामध्ये स्वत:, इतर आणि परिस्थिती यांच्यामधल्या; खऱ्या सुधारणेची ईश्वरी प्रक्रिया अनुस्यूत असते!

Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views ( 5398 )  |  User Rating
Rate It



None
To
Scrap Flag
Scrap