World's first medical networking and resource portal

Articles
Category : All
Medical Articles
Sep16
लेखांक २ श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्रातील
श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्रातील वैश्विक चैतन्य: डॉ. श्रीनिवास कशाळीकर

लेखांक २. विष्णुसहस्रनाम म्हणजेच विष्णूची एक हजार नावे. ही एक हजार नावे आठवणे किंवा स्मरणे म्हणजे एकामागून एक अशा प्रकारे आपले एक हजार डोळे उघडण्यासारखे आहे. हे एक हजार डोळे अर्थात अंत:चक्षु जसे उघडत जातात तसे आपल्याला आपले आणि विश्वाचे सच्चिदानंदमय मूळ स्वरूप अधिकाधिक जाणवू लागते. कालांतराने आपण आपल्या ह्या मूळ स्वरूपाशी तद्रूप होतो.
आपल्या ह्या एक हजार डोळ्यांतून आपल्या सर्वांच्या अंतर्यामी जाणवणाऱ्या ह्या आशयाचे म्हणजेच आनंदसंजीवनीचे वैशिष्ट्य कोणते आणि व्यक्ती आणि विश्व ह्यांना अंतर्बाह्य व्यापणाऱ्या ह्या कालातीत सत्याची प्रचीती म्हणजे काय; हे आपण वीजेच्या बल्बच्या उदाहरणाने समजून घेण्याचा प्रयत्न करू.
ज्याप्रमाणे बल्ब विजेमुळे ‘पेटतो’, त्याचप्रमाणे सजीव आणि निर्जीव सृष्टीतील अणुरेणु; चिरंतन सत्यामुळे क्रियाशील होतात. ह्या सत्यालाच सच्चिदानंद म्हणतात. ह्या आनंदरूप सत आणि चित अश्या सत्यालाच; पुरुष-प्रकृती, शिव-शक्ती, लक्ष्मी-नारायण, सीता-राम, राधा-कृष्ण ह्या द्वंद्वानी ओळखले जाते. ज्याप्रमाणे बल्ब फुटला तरी वीज नष्ट होत नाही, त्याचप्रमाणे मनुष्य देह जरी नष्ट झाला तरी त्याचे सच्चिदानंद स्वरूप नष्ट होत नाही.
अर्थात ही तुलना मर्यादित अर्थाने समर्पक आहे. बल्ब आणि मनुष्यात फरक आहे.
बल्बला त्याचे मूळ स्वरूप वीज आहे हे कळण्याची व्यवस्था नाही. तसेच बल्बला त्याच्या स्वत:च्या आणि इतर बल्बांच्या वीजमय मूळ स्वरूपाशी समरस होऊन अमर आणि स्वतंत्र होता येत नाही.
याउलट, मनुष्याला त्याचे मूळ स्वरूप सच्चिदानंद असून स्वत:च्या आणि विश्वाच्या अंतर्यामी देखील हा सच्चिदानंद आहे हे कळू शकते. एवढेच नव्हे, तर त्याच्याशी समरस होता येते आणि अमर व स्वतंत्र होता येते.
दुसरा फरक असा की, बल्ब आणि विजेचा संयोग ही भौतिक घटना तिसऱ्या भौतिक घटकामुळे होते, तर मनुष्य आणि सच्चिदानंद ह्यांच्यातील नाते, ह्या नात्याची मनुष्याला येणारी जाण आणि यातून होणारा आविष्कार, हे सारे सच्चिदानंदाच्या सत्तेनेच होत असते.


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (1757)  |  User Rating
Rate It


Browse Archive