World's first medical networking and resource portal

Articles
Medical Articles
Aug21
गोंदवलेकर महाराज मला समजलेले १७. प्रपंच हे
१७. प्रपंच हे साधन आहे, परमार्थ हे साध्य आहे डॉ. श्रीनिवास कशाळीकर

श्री. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, “प्रपंच हे साधन आहे, परमार्थ हे साध्य आहे”.
लहानपणी साधन आणि साध्य ह्यामध्ये घोळ होतो हे खरे, पण मोठेपणी देखील समजुतीमध्ये जरी नाही तरी पण वागण्यात मात्र गोंधळ होतो!

नामस्मरणाचा अभ्यास करताना एकदम काही आपल्याला आत्मज्ञान होत नाही. आपण सामान्यच असतो. आतील आणि बाहेरील जगाचे आपल्यावर बरे-वाईट परिणाम होतच असतात. त्यामुळे आपली माफक अपेक्षा असते की; सरकारने अश्या योजना आखाव्या, अशी धोरणे राबवावी, असे कायदे आणि नियम करावे की ज्यांचे पालन करताना आपल्या सदसद्विवेक बुद्धीचा कोंडमारा होणार नाही, आपले जगणे मुश्कील होणार नाही आणि असहाय्य होणार नाही! कारण तसे झाले की कायदे मोडावे लागतात किंवा कायद्यामधून पळवाटा काढाव्या लागतात. मनात असो वा नसो अशी चोरी करावी लागते. मग कायद्याने शिक्षा मिळण्याची जशी भीती असते तशीच स्वत:चे मन देखील स्वत:ला खात असते.

उलट, हे कायदे जर सुयोग्य असले, तर ते पाळल्यामुळे आपल्या अंतरात्म्याचे समाधान होत राहील आणि जीवनाची कृतकृत्त्यता, कृतार्थता आणि सार्थकता झाल्याची जाणीव आपल्याला होत राहील!
पण असे घडताना दिसत नाही! कायदे पाळताना (ते अन्याय्य असल्यामुळे) आणि मोडताना (भीतीमुळे वा मन खात असल्यामुळे) दोन्ही प्रसंगी आपल्या आतल्या आत संघर्ष चालूच राहतो. काय करावे हे आपल्याला सुचत नाही! आपण खिन्न होतो. असहाय्य होतो.

नाम आणि नामस्मरण यांची तोंडओळख झाली की, नकळत आपल्या संकुचित बुद्धीनुसार आपल्या मनात त्याविषयी अवास्तव कल्पना तयार होतात. नामाची सत्ता बलवत्तर आहे असे ऐकल्यामुळे; नामस्मरणाने सर्व परिस्थिती बदलेल ही आशा पल्लवित होते! नामस्मरणाने आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक अश्या सर्वच कल्पना आणि अपेक्षा पूर्ण होतील असे आपल्याला वाटू लागते.

त्याप्रमाणे; परिस्थिती बदलण्यासाठी आपण अधिक जोर देऊन नामस्मरण करू लागतो. असे करताना अनवधानाने आपण नामस्मरणाला (भगवंताला) साधन बनवतो आणि आपल्या कल्पनेतल्या कौटुंबिक व सामाजिक प्रपंचाला साध्य! मग कुटुंबात वा समाजात मनासारखे घडले नाही की निराश होतो!
पण आपली वैयक्तिक आणि सामाजिक परिस्थिती कशीही असली तरी हताश न होता आणि खचून न जाता; आपण आपल्या सद्गुरूंचे, श्री. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे वचन, पुन्हा पुन्हा लक्षात आणून आहे त्या परिस्थितीचा (प्रपंचाचा) उपयोग परमेश्वर प्राप्ती साध्य करण्यासाठी केला तर असहाय्यता नक्कीच कमी होते.

थोडक्यात सांगायचे तर, चिकाटीने नामस्मरण करीत गेले, की कालांतराने समजू लागते, की वैयक्तिक आणि सामाजिक जीवनातील सारे काही आपल्या मनाप्रमाणे नाही, तर प्रारब्धाच्या नियमांनुसार, पण नामाच्या सत्तेनेच घडत असते! तसेच हे देखील कळू लागते की सरकार सरकार असे ज्याला आपण म्हणतो, ते सरकार देखील कालमहात्म्यानुसार खरे, पण नामाच्या सत्तेखालीच वावरत असते!
नामाच्या सत्तेनेच आपल्या कळत-नकळत; अगदी तंतोतंत आपल्या मनाप्रमाणे जरी नाही तरी श्री. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांना अभिप्रेत असलेल्या संस्कृती आणि सुधारणा; आपल्या व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनात अधिकाधिक प्रमाणात आविष्कृत होत असतात! सदभिरुची, सदिच्छा, सत्संकल्प, सत्प्रेरणा, सत्बुद्धी, सद्भावना, सद्वासना, सदाचार; वेगवेगळ्या स्वरूपात प्रत्यक्षात येत असतात.

अश्या तऱ्हेने; नामस्मरण करता करता नामाचे गोडी वाढते. नामातील शक्ती जाणवते. अलगद आपल्या कल्पना, आपल्या अपेक्षा आणि आपल्या आवडी निवडी बाजूला पडतात.
नामच धरून राहिले की, नामाच्या इच्छेनुसार आपण स्वत: आणि जग दोन्हीही नामाच्या सत्तेने आणि सुयोग्य पद्धतीने बदलतात; याचा प्रत्यय घेऊ लागतो. मग नामासाठीच नाम घेऊ लागल्यावर नाम साध्य व प्रपंच साधन आहे हे नुसते पटत नाही, तर साधनरूप प्रपंचामागे होणारी आपली फरफट कमी कमी होत जाते. नामासाठी आणि नाम (परमार्थ) हे साध्य म्हणून आहे ती परिस्थिती (प्रपंच) साधन म्हणून वापरून नामस्मरण करणे हेच आपल्या सर्वांच्या कल्याणाचे आहे ह्याची खात्री पटत जाते!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (5661)  |  User Rating
Rate It


Aug21
गोंदवलेकर महाराज मला समजलेले १६. भवसागरात&#
१६. भवसागरातून तरुण जाण्यासाठी भगवंताचे नाम आहे डॉ. श्रीनिवास कशाळीकर

श्री. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, “मनुष्यप्राणी भवसागरात गटांगळ्या खातो आहे; समुद्रातून तरुन जाण्यासाठी जशी नाव, तसे भवसागरातून तरुण जाण्यासाठी भगवंताचे नाम आहे”.

भवसागर म्हणजे काय?

पूर्वी भवसागर ही एक कपोलकल्पित बाब वाटत असे. कुठला भवसागर आणि कसचं काय? असं वाटत असे. पण आपला देह आणि मन हे खरोखरच महासागराप्रमाणे अथांग आहेत! आपल्या देहातल्या आणि मनातल्या असंख्य गुंतागुंतीच्या आणि वेगाने घडणाऱ्या आणि भंडावून सोडणाऱ्या घडामोडी खरोखरच वादळाप्रमाणे आहेत. परस्परविरोधी वासना, भावना, विचार आणि त्यांमधला गोंधळ हे नाकातोंडात जाणाऱ्या पाण्याप्रमाणे आहेत. जीव गुदमरून टाकणाऱ्या आहेत. त्यामुळे मनुष्यप्राणी भवसागरात गटांगळ्या खातो आहे हे अक्षरश: खरे आहे.

भवसागरात गुदमरून बुडताना तरुन जाणे अत्यंत महत्वाचे असते. कारण त्याशिवाय आत्मज्ञानाचा प्राणवायू मिळू शकत नाही! आत्मज्ञान म्हणजेच भक्ती. आत्मज्ञान म्हणजेच शाश्वत समाधान. ह्यालाच गुरुभेट म्हणतात. प्राणवायूशिवाय प्राणी जसा तळमळतो, त्याचप्रमाणे आत्मज्ञान, भक्ती, शाश्वत समाधान म्हणजेच गुरुभेटीच्या अनुभवाशिवाय साधक तळमळतो.

म्हणून समुद्रातून तरुन जाण्यासाठी जशी नाव तसे भवसागरातून तरुन जाण्यासाठी भगवंताचे नाम आहे, हे देखील शब्दश: खरे आहे. कारण अश्या तऱ्हेने तरुनच साधकाला त्याची तळमळ शांत करणारा आत्मज्ञानाचा प्राणवायू मिळू शकतो. समुद्रातून बाहेर येताना माणूस नाव मागे सोडतो. पण भवसागरातून बाहेर येताना साधक मात्र नामरुपी नाव आपल्याबरोबरच घेतो. किंबहुना तो नाममयच होतो!

सर्व महान संतांनी आणि आपल्या सद्गुरुनी कोणतीही पूर्व अट न ठेवता नामस्मरणाची भक्कम नौका आपल्यासाठी खुली केली आहे! त्यामुळे, आपण कितीही पतित असलो तरी धास्तावून जाता कामा नये. आजूबाजूच्या आप्त- स्वकीयांनी कळत नकळत त्यांच्या देहबुद्धीपायी नामस्मरणाला नावे ठेवली, आपल्याला दुषणे दिली, आपला पाणउतारा केला, अडचणी दाखवून नाउमेद केले, ज्ञान व कर्मकांडाचा बाऊ करून भीती घातली; तरी आपल्या देहबुद्धीपायी आपण विचलित होता कामा नये. नाउमेद होता कामा नये. नामस्मरण सोडता कामा नये.

आपण कितीही दुबळे असलो, कितीही पतित असलो आणि वादळे कितीही भीषण आणि रौद्र असली तरी धीर सोडता नये! सद्गुरुकृपेने मिळालेली नामाची अतिभक्कम आणि सुरक्षित नौका; चिकाटीने नामस्मरण करीत कोणत्याही परिस्थितीत सोडता कामा नये! नामस्मरणाच्या ह्या नौकेतूनच आपण शाश्वत समाधानाच्या पैलतीराला नक्की पोचू!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (5628)  |  User Rating
Rate It


Aug21
गोंदवलेकर महाराज मला समजलेले १५. देहबुद्ध&
१५. देहबुद्धी जोपर्यंत आहे तोपर्यंत नामाचे महत्व कळणार नाही: डॉ. श्रीनिवास कशाळीकर

श्री. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, “देहबुद्धी जोपर्यंत आहे तोपर्यंत नामाचे महत्व कळणार नाही. आपला उद्धार व्हावा असे वाटत असेल तर नामस्मरण सोडू नये”.

देहबुद्धी म्हणजे स्वत:ला देहापुरते मर्यादित मानणे. किंबहुना आपण केवळ मर्त्य आणि जड असे देहच आहोत, अन्य काही नाही अशी ठाम खात्री आणि धारणा असणे! देहबुद्धीमुळेआपल्या वासना, आपल्या भावना आपले विचार आपल्या देहाभोवती फिरत असतात. आपण आपल्या मूळ सच्चिदानंद स्वरूपापासून अवनत होतो, आकुंचन पावतो आणि संकुचित बनतो. हेच संकुचित स्वार्थाचे मूळ होय. ह्यामुळे आपला दृष्टीकोन मर्यादित बनतो, बुद्धी मंद आणि स्थूल बनते, भावना अप्पलपोटी बनते आणि आपल्या वासना असमंजस आणि बेफाम बनतात. यामुळे आपला अहंकार न गोंजारणारी आणि खऱ्या अर्थाने निस्वार्थ अशी कोणतीही बाब आपल्याला तुच्छ वाटते. तिरस्करणीय वाटते. नाम हे असेच आहे. त्यामुळे नामस्मरणाचा आपल्याला तिटकारा येतो. त्यामध्ये आपल्याला गोडी वाटत नाही. ह्यामुळेच आपण आपण नामस्मरणाला नावे ठेवतो. त्याला निरुपयोगी वा प्रगतीविरोधी म्हणतो. त्याला विरोध करतो. रोगी व्यक्तीच्या जिभेची चव गेल्यामुळे तिला जसे अन्न नकोसे होते, तसे हे आहे.

वेगळ्या भाषेत सांगायचे तर, देहबुद्धी असणे म्हणजे डबक्यात राहणे. ज्याप्रमाणे, डबक्यात बसून समुद्राची कल्पना येत नाही, त्याप्रमाणे देहबुद्धी जोपर्यंत आहे तोपर्यंत नामाचे महत्व काळात नाही.

याउलट नामस्मरणाची सुरुवात होणे हे प्रत्येकाच्या अंतरंगातील सुप्त उर्ध्वगामी ओढ प्रभावी होण्याचे म्हणजेच मर्यादित अशा देहाच्या ओढीचा प्रभाव कमी होण्याचे लक्षण आहे!

नामस्मरण जसे वाढत जाते तशी देहाची ओढ आणखी कमी होते आणि नामविस्मरणाच्या डबक्यातून आपण नामस्मरणाच्या समुद्रात येतो. स्वत:ची विशालता परत मिळाल्यामुळे, नामाची महानता अधिकाधिक समजू लागते!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (5529)  |  User Rating
Rate It


Aug21
गोंदवलेकर महाराज मला समजलेले १४. नेहमी साव
१४. नेहमी सावध असावे डॉ. श्रीनिवास कशाळीकर

श्री. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, “ मान अपमान जगतात I ते मूळ कारण झाले घातासI तेथे राहावे सावधI वृत्ति करुनिया स्थिरII”, “वृत्ति शांत होणे हाच नामाचा अनुभव आहे. नेहमी सावध असावे. आणि उर्मिच्या आहारी जाऊ नये. उर्मी आवरली पाहिजे” आणि “जेथे आळस माजला तेथे परमार्थ बुडाला”.

पण नेहमी सावध असावे हे आपल्याला नकोसे वाटते. कारण, आम्हाला सावधानता म्हणजे आमच्या आळसामध्ये व्यत्यय वाटतो! आळसापुढे आम्हाला दुसरे काहीही सुचत नाही आणि नको असते! कारण आळस आपल्या नसानसामध्ये भरलेला असतो! हाडीमांसी खिळलेला असतो! किंबहुना, आपण आळसरूपच बनलेले असतो!

पण असे असले तरी आपले आयुष्य आणि परिस्थिती तर सतत आणि वेगाने बदलत असते! काळाला आपण थांबवू शकत नाही! बदल आपण टाळू शकत नाही! उलट, आळसापायी बेसावध असल्यामुळे आपला संकुचितपणा तसाच राहिलेला असतो, “हवे-नको”पण असते, हेकेखोरपणा तसाच असतो आणि यामुळे जे आहे त्यात आम्हाला समाधान नसते! अश्या असमाधानातून तयार झालेली पोकळी आयुष्याच्या अखेर आपल्याला खायला येते! एका बाजूला आशा आणि हवे-नकोपण प्रचंड आणि दुसऱ्या बाजूला क्षमता मात्र संपलेली अशी आपली असहाय्य आणि दयनीय अवस्था झालेली असते. जेथे आळस माजला तेथे परमार्थ बुडाला म्हणजे हेच!

गुरुकृपेने सतत नामस्मरण होऊ लागले की हळु हळु आळस कमी कमी होऊ लागतो. आपण सावध होऊ लागतो. सावध राहणे आणि उर्मी आवरणे आपल्या अंगवळणी पडू लागते. ह्या सावधपणामुळे; आळसांची आवड कमी होऊ लागते. आळस आपल्या हिताच्या आड येतो आहे हे कळू लागते. आपला संकुचितपणा हाव वाढवतो हे लक्षात येउ लागते. आपला क्षुद्र अहंकार आपल्याला प्रत्येक बाबतीत तक्रार करायला भाग पाडतो आहे हे ध्यानी येऊ लागते! अधिकाधिक प्रसंगांमध्ये आपल्याला स्वत:चे अकर्तेपण आणि रामाचे कर्तेपण जाणवू लागते. ह्या जाणीवेमुळे आयुष्यात येणाऱ्या अप्रिय प्रसंगांमध्ये, संकटांमध्ये, नुकसानीमध्ये; स्वत:ला, इतरांना आणि परिस्थितीला दोष देण्यापूर्वी आपल्याला “राम कर्ता” ह्याची आठवण होते आणि आपले समाधान भंगणे कमी होते!

ह्यामुळे आहे त्या परिस्थितीत आपले नामस्मरण टिकू लागते आणि वाढू लागते! आश्चर्याची बाब म्हणजे आपल्या लक्षात येऊ लागते की हीच ती स्थिती जिच्यामध्ये स्वत:, इतर आणि परिस्थिती यांच्यामधल्या; खऱ्या सुधारणेची ईश्वरी प्रक्रिया अनुस्यूत असते!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (5395)  |  User Rating
Rate It


Aug21
गोंदवलेकर महाराज मला समजलेले १३. प्रपंचात
१३. प्रपंचात खरी विश्रांती डॉ. श्रीनिवास कशाळीकर

श्री. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, “ सगळ्या प्रपंचात खरी विश्रांती असेल तर ती नामस्मरणातच आहे”.

आपल्या परीने कितीही मौजमजा केली किंवा आपल्या स्वत:च्या किंवा आईवडिलांच्या महत्त्वाकांक्षेनुसार अर्थकारण, समाजकारण, राजकारण, धर्मकारण केले, तरी यश मिळो वा अपयश ते तात्कालिक आणि वरवरचे असल्याने आपले समाधान होत नाही! साहजिकच अश्या तऱ्हेने जेव्हा समाधान होत नाही, तेव्हा अस्वस्थता येते!

प्रथम अस्वस्थता, मग अभ्यास, मग शोध, मग नामाची ओळख, मग संशय, मग द्वंद्व, मग चिकित्सा, मग थोडे थोडे नामस्मरण, मग वासना आणि नाम यांच्यातली रस्सीखेच, वासनेमागून फरफट, बळजबरीचे नामस्मरण, हळु हळु नामाच्या महानतेची वाढती समज, मग नामस्मरणाचा सक्रीय प्रचार व प्रसार, मग उत्तेजना, मग वाढते नामस्मरण, मग अधिक उत्तेजना, मग अधिक अभ्यास आणि नामाचा अधिक उत्साहाने प्रसार, पण मधून मधून निराशा आणि उद्वेग, याशिवाय पुन्हा पुन्हा संशय, कधी कधी खिन्नता, मग अधिक नामस्मरण; अशा टप्प्या-टप्प्यानी; आपली प्रगती होते.

पुढे आपले सद्गुरू दिवसाचे १२-१३ तास नामस्मरण करण्यासाठी आपल्याला सक्षम आणि समर्थ बनवतात.

म्हणजेच; अर्थकारण, समाजकारण, राजकारण, धर्मकारण; ह्या सर्वांना सामावणारे आणि सर्वांना आधारभूत असे नामकारण करण्यासाठी (नामस्मरण आणि त्याचा प्रसार करण्यासाठी) आपले सद्गुरू आपल्याला सक्षम आणि समर्थ बनवतात! म्हणजेच शाश्वत समाधानासाठी लायक बनवतात!

आपल्याला जेव्हां हे कळते, तेव्हां आपले सद्गुरू आपल्याला भेटणे आणि नामस्मरणाचा व पर्यायाने नामकारणाचा लाभ होणे याची किंमत आपल्याला थोडीफार कळू लागते आणि नामकारण करता येणे हे आपल्या जन्मोजन्मीचे भाग्य आहे असे आपल्या लक्षात येते!

विशेष हणजे ज्याला आपण विश्रांती समजत होतो तो केवळ आळस होता व म्हणूनच ती खरी विश्रांती नव्हती व खरी विश्रांती नामस्मरणातच आहे हे ध्यानी येते व सद्गुरुंबद्दलची कृतज्ञता शतपटीने वाढते!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (5291)  |  User Rating
Rate It


Aug21
गोंदवलेकर महाराज मला समजलेले १२. नाम घेणाऱ
१२. नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो डॉ. श्रीनिवास कशाळीकर

श्री. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, "वाटेल ते झाले तरी भगवंताचे नाम सोडू नका, नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो हे माझे सांगणे शेवटपर्यंत विसरू नका."

वाटेल ते झाले तरी भगवंताचे नाम सोडू नका असे; सद्गुरू का म्हणतात?

कारण नामस्मरण चालू असले तरी, आपले शरीर, मन आणि परिस्थिती सतत आणि वेगाने बदलत असते. अश्या बदलत्या परिस्थितीत क्षणोक्षणी काय होते आहे आणि काय हवे आहे हे कळत नाही! एवढेच नव्हे तर आपल्याला काही कळत नाही हे देखील कळत नाही! बदल नको म्हणून, सतत होत असलेला बदल टाळता येत नाही आणि बदल हवा म्हणून हवा तो बदल घडवताच येतो असेही नाही! बरं हवा तो बदल घडला, तरी पुन्हा तो नकोसा होतो आणि पुन्हा आपण अस्वस्थ ते अस्वस्थच राहतो!
अश्या वेळी आपण संकुचित बनलेले असल्यामुळे संकुचित स्वार्थ गोंजारणाऱ्या, चुचकारणाऱ्या आणि पोसणाऱ्या बाबींना आपण घट्ट धरून बसलेले असतो! त्यामुळे या बाबी आपल्यापाशी तश्याच सुरक्षित राहतात! पण ज्यातून संकुचित स्वार्थ जपला जात नाही अश्या गोष्टींकडे मात्र आपले दुर्लक्ष होते आणि त्या आपल्या स्मरणातून जाऊ शकतात. संकुचित स्वार्थ न जपणारी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे भगवंताचे नामच! तेच प्रथम आपल्याकडून सुटण्याचा आणि आपण विस्मरणाच्या गर्तेत जाणाचा संभव असतो!

अश्या वेळी आपल्याला विस्मरणरुपी मृत्युच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी सद्गुरूंनी निव्वळ कृपाळूपणे नव्हे तर अगदी कळवळून पुढे केलेला मदतीचा हात म्हणजे सद्गुरूंचे हे सांगणे आहे!
“नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो” म्हणजे काय?

आपले मन उथळ आणि संकुचित असल्यामुळे कल्याण याचा अर्थ केवळ बाह्य परिस्थिती सुधारणे असा वाटतो. पण बाह्य परिस्थिती ही प्रारब्धानुसार ठरत असते आणि खरे म्हणजे ती बाधत नाही. त्यामुळे केवळ बाह्य आणि दृश्य परिस्थितीवरून कल्याण – अकल्याण ठरत नाही! पण आपण हे सत्य लक्षात न घेता केवळ बाह्य व दृश्य परिस्थिती मनाप्रमाणे बदलली नाही की नामावरचा विश्वास गमावतो! हे टाळण्यासाठी कल्याण याचा अर्थ नीट समजायला आणि आंत भिनायला हवा!

कल्याण याचा अर्थ; अपूर्ण, संकुचित आणि भ्रामक अस्वस्थतेतून पूर्ण, उदात्त आणि शाश्वत स्वस्थतेकडे, समाधानाच्या स्थितीत जाणे आणि अश्या शाश्वत स्वस्थतेला व समाधानाला पूरक असे कार्य; जीवनाच्या ज्या क्षेत्रात (शिक्षण, आरोग्य, राजकारण, संरक्षण, समाजकारण, व्यापार, उद्योग, चित्रकला, संगीत, नाटक, सिनेमा इत्यादी) आपण वावरत असू त्या क्षेत्रात आपल्याकडून घडणे!
नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो ते हे असे!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (5229)  |  User Rating
Rate It


Aug21
गोंदवलेकर महाराज मला समजलेले ११. आनंद हा अत
११. आनंद हा अत्यंत विशाल आहे: डॉ. श्रीनिवास कशाळीकर

श्री. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, “आनंद हा अत्यंत विशाल आहे. देहबुद्धी मेली म्हणजेच त्याची प्राप्ती होत असते”.

सद्गुरु म्हणजेच ईश्वर. तोच खरा आनंदमय असून अंतर्बाह्य सर्व काही व्यापून आहे. कालातीत आहे. पण आपण आपल्या देहात असताना आपल्यामध्ये देहाच्या मर्यादा येतात. देहाच्या गरजा, वासना, भावना, विचार, कल्पना, दृष्टीकोन यांचे गाठोडे आपल्या उरावर बसते. ह्या गाठोड्यालाच अहंकार म्हणतात. ह्या अहंकारामध्ये आपण बंदिस्त होतो आणि आपल्या विशाल आनंदमय स्वरूपापासून तुटतो आणि वेगळे होतो. ह्या वेगळेपणात अपूर्णता, अस्वस्थता, असुरक्षितता, धडपड, फरपट, दुबळेपणा, दु:ख आणि भीती आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे भ्रम आहे.

आपल्या भ्रमामुळे आपण हे विसरतो, की आपली वृत्ति सारखी बदलत आहे. आपली स्वप्ने, आपले संकल्प, आपले आराखडे हे सारे आपल्या इच्छे–अनिच्छे पलिकडे बदलत आहेत. त्याचप्रमाणे जगही आपल्या इच्छे-अनिच्छेपलिकडे; सारखे बदलत आहे. आपण विसरतो, की सतत बदलत असल्यामुळे, अमुक परिस्थितीमुळे सुख आणि अमुक परिस्थितीमुळे दु:ख होते हे आपले वाटणे अजिबात खरे नव्हे. कारण ते सुखदु:ख अस्थिर आणि म्हणून भ्रामक आहे! साहजिकच आपण हे देखील विसरातो, की स्वत:चे असो वा जगाचे; भ्रामक दु:ख घालवण्यासाठी आपण जे तळमळतो आणि धडपडतो तो केवळ जीवनप्रवासातला एक अपरिपक्वतेचा आणि आकुंचित अवस्थेचा टप्पा आहे!

सद्गुरुंच्या सत्तेने आणि आमच्या प्रारब्धानुसार आणि देहबुद्धीपायी आलेल्या अहंकाराने धडपडता धडपडता आणि तळमळता तळमळता; सद्गुरुकृपेनेच आम्हाला नामस्मरणाचा मार्ग मिळतो आणि सद्गुरुकृपेनेच नामस्मरण वाढत जाऊन देहबुद्धी आणि अहंकाराच्या भिंती ढासळू लागतात. अश्या तऱ्हेने सद्गुरूकृपेमुळे आमचा आकुंचितपणा आणि संकुचितपणा जसा जसा कमी होत जातो आणि विशालत्व येऊ लागते तशी तशी आम्हाला आमच्या स्वत:च्या सच्चिदानंदस्वरूपाची म्हणजेच विशाल आणि परिस्थितीनिरपेक्ष अशा नामानंदाची अधिकाधिक प्रचीती येत जाते!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (4133)  |  User Rating
Rate It


Aug21
गोंदवलेकर महाराज मला समजलेले : १०. देवाची (खर
१०. देवाची (खरी) कृपा डॉ. श्रीनिवास कशाळीकर

श्री. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात “देवाची ज्याच्यावर कृपा आहे त्याला तो पोटापुरता पैसा देतो, पण ज्याची परीक्षा पाहायची त्याला भगवंत जास्त पैसा देतो”.

आपल्यातल्या बहुतेकांना तर याच्या उलट वाटत असते! आपला समज असा असतो की जेवढा पैसा जास्त मिळेल, तेवढे आपण जास्त सुख मिळवू शकतो! त्यामुळे गडगंज पैसा मिळणे हेच भाग्याचे लक्षण आणि हीच देवाची कृपा असेच आम्हाला वाटत असते! अगदी मनापासून विचार केला तरी, पोटापुरत्या पैशाने सुख मिळू शकत नाही आणि म्हणून गरीबी हा शापच आहे असेच आम्हाला वाटत असते!

मग खरं काय? सद्गुरू की आपण?

उत्तर सोपं आहे!

पण सद्गुरूंच्या अनंत, परिपक्व आणि नि:पक्षपाती सर्वज्ञतेचा अभिप्राय असा की “जास्त पैसा” मिळाला की आपण भरकटू शकतो! आपल्या आकांक्षा वाढतात, वासना भडकतात, इर्षा उसळते, काळजी पोखरते, असंतोष खदखदू लागतो! ह्या सर्व बाबी सुख द्यायचे सोडाच, समाधानाच्या आडच येतात! जास्त पैशामुळे अश्या तऱ्हेने आपली अस्वस्थता वाढते. असमाधान वाढते. ह्या सर्व बाबी नियंत्रणात ठेवणे ही अत्यंत कठीण आणि कसोटीचीच बाब असते! भल्याभल्याना जास्त पैशामुळे स्वत:वर नियंत्रण ठेवणे अशक्य होते! अनेक छंद, व्यसने आणि हितशत्रू यामुळे संकटे वाढतात!
जास्त पैशामुळे आपण सहज मार्गभ्रष्ट होऊ शकतो आणि रसातळाला जाऊ शकतो!

उलट पोटापुरता पैसा मिळाला तर आपल्या वासना आणि हाव ह्यांच्यावर आणि स्वैराचारावर आपसूक बंधने येतात! सुरुवातीला ही बंधने त्रासदायक वाटली तरी, नामस्मरणाची जगोडी वाढण्यासाठी ह्या बंधनांचा आपल्याला फायदाच होतो!

म्हणूनच सद्गुरू म्हणतात तेच खरे आहे! पोटापुरता पैसा मिळणाऱ्या आपल्यातल्या बहुसंख्यांवर देवाची कृपा आहे!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (2008)  |  User Rating
Rate It


Aug21
गोंदवलेकर महाराज मला समजलेले ९. तर जीवनाचे
९. तर जीवनाचे सोने होते डॉ. श्रीनिवास कशाळीकर

श्री. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, "जगात कुठलीही गोष्ट अती केली की माती होते पण नामस्मरण ही ऐकमेव गोष्ट आहे की ती अती केले की माती नाही तर जीवनाचे सोने होते. नामामुळे परमेश्वराला तुमच्या बरोबर रहावे लागते"

मला कळलेला याचा अर्थ असा की नाम म्हणजेच ब्रह्म आणि नाम म्हणजेच भगवंत आहे. नाम आपल्या अस्तित्वाचा गाभाच आहे. त्यामुळे, नामस्मरणाने आपण आपल्या आत, आपल्या अस्तित्वाच्या गाभ्याकडे, जिथे परमेश्वराची म्हणजेच सद्गुरूंची वस्ती असते तिथे जातो! त्यामुळे नामस्मरण अती झाले तर त्यामुळे काहीही बिघडण्याचा (माती होण्याचा) प्रश्नच येत नाही! अती नामस्मरणाने फार तर आपण परमेश्वराच्या म्हणजेच सद्गुरुंच्या म्हणजेच स्वत:च्या सच्चिदानंदस्वरूपाच्या (कालातीत, अजरामर चैतन्याच्या आणि शाश्वत समाधानाच्या) अधिक निकट पोचू! तद्रूप होऊ; नाही का? पण ही तर सर्वश्रेष्ठ उपलब्धी आहे! नामस्मरण हे अमृत आहे असे जे म्हणतात ते ह्याच कारणासाठी! अमृत म्हणजे मृत्युच्या पलिकडे नेणारे, अमर करणारे. हा अनुभव आपल्याच अस्तित्वाच्या गाभ्याचा असतो, म्हणून, ह्याला कोणी आत्मानुभूती, कोणी आत्मसाक्षात्कार. तर कोणी आत्मज्ञान म्हणतात. मर्त्य जीवनाच्या कोंडवाड्यातून वा तुरुंगातून सुटका होऊन अमर अस्तित्वाचे स्वातंत्र्य मिळते म्हणून कोणी ह्यालाच खरे स्वातंत्र्य, कोणी मोक्ष, तर कोणी मुक्ती म्हणतात. सगुण भक्ती करणारे भक्त ह्याच अनुभवाला भगवंताचे दर्शन म्हणत असल्यामुळे, ह्याच अलौकिक अनुभवाचे वर्णन; सद्गुरू, "परमेश्वराला तुमच्या जवळ राहावे लागते" असे करतात.

त्याचप्रमाणे, ह्या एका परीने अत्यंत आतल्या आणि अत्यंत खाजगी अश्या अनुभवातच आपले, आपल्या कुटुंबाचे आणि संपूर्ण विश्वाचेही शाश्वत कल्याण असते. कारण नाम घेणारी व्यक्ती, तिची इच्छा असो वा नसो, कधीही स्वत:चे संकुचित कल्याण साधू शकत नाही. म्हणून, असे सार्वत्रिक कल्याण नामस्मरणात असल्याने, ह्यालाच "जीवनाचे सोने होते" असे सद्गुरू म्हणतात! वाचन लेखनाने; नामस्मरण करण्याचा आपला निर्धार बळकट होऊ शकतो, पण केवळ तेवढा पुरत नाही! सद्गुरुंच्या सांगण्याचा प्रत्यक्ष अनुभव सतत नामस्मरण केल्यानेच येऊ शकतो!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (1859)  |  User Rating
Rate It


Aug21
गोंदवलेकर महाराज मला समजलेले : ८ आपली वृत्त
८. आपली वृत्ति सारखी बदलत आहे डॉ. श्रीनिवास कशाळीकर

श्री. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, “आपली वृत्ति सारखी बदलत आहे आणि जगही सारखे बदलत आहे. त्यामुळे अमुक परिस्थितीमुळे सुख आणि अमुक परिस्थितीमुळे दु:ख होते हे वाटणे खरे नव्हे. कारण ते सुखदु:ख अस्थिर असते.”

ह्या शिकवणीचे महत्व काय आहे?

आपल्याला प्रत्येक परिस्थिती ही त्या त्या वेळी कायमचीच आहे असे वाटते. त्याचप्रमाणे आपल्याला जे वाटते तेच १०० टक्के सत्य आहे असे आपल्याला वाटते. यामुळे सुख आणि दु:ख देणारी परिस्थिती आपल्या अपेक्षेच्या विपरीत बदलली की आपल्या मनाला जोरदार धक्के बसतात आणि मनाची घालमेल होते! त्यामुळे कायम आपल्या मनात एक प्रकारची हुरहूर राहते. आपल्याला, आहे त्यापेक्षा काही तरी भव्य-दिव्य आणि रोमांचक घडवावे किंवा घडावे असे वाटत असते आणि आपल्यां मनाप्रमाणे घडले नाही की आपल्याला वाईट वाटत असते. म्हणूनच समाधान मिळवण्यासाठी आपल्याला सद्गुरूंची शिकवण नीट समजून घ्यायला हवी.

आज आपल्याला जे जग दिसते ते क्षणोक्षणी बदलत असल्यामुळे आणि आपले शरीर आणि मन देखील बदलत असल्यामुळे आपले “वाटणे” देखील बदलत असते! त्याचप्रमाणे, आपल्याला जे काही बरे-वाईट वाटत असते, ते मुळात ईश्वरेच्छेने (म्हणजेच गुरुच्या इच्छेने) “वाटत” असते. तसेच, जगाला काय “वाटावे” हे देखील मुळात ईश्वरेच्छेनेच ठरत असते! आपण जे बरे-वाईट वागतो, ते ईश्वरेच्छेनेच वागतो आणि इतरांनी काय करावे, कसे करावे आणि केव्हा करावे हे देखील ईश्वरेच्छेनेच ठरत असते!
वास्तविक पाहता, आपण आणि जग; दोन्हीही आपल्या कल्पनेच्या पलिकडे, आपल्या मनाच्या वेगाहून अधिक वेगाने आणि आपल्या बुद्धीपेक्षा अधिक अचूकपणे; ईश्वरेच्छेने “सुधारत” असतात! आपण आणि आपल्या कल्पना स्थूल असल्यामुळे, आपल्याला ह्या सत्याचा म्हणजेच “राम कर्ता” ह्या सत्याचा विसर पडत असतो आणि आपण पुन्हा पुन्हा अस्वस्थ होत असतो! तडफडत असतो.

नामस्मरण करता करता हळूहळू, पण निश्चितपणे आणि अधिकाधिक स्पष्टपणे समजते की आपले आकलन, आपली मते, आपल्या कल्पना, आपली आवड आणि आपली बुद्धी ईश्वरेच्छेशी म्हणजेच सद्गुरुंच्या इच्छेशी जशी तद्रूप होत जाते तसे आपण अधिकाधिक स्वस्थ आणि समाधानी होत जातो!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (1819)  |  User Rating
Rate It


Browse Archive