World's first medical networking and resource portal

Articles
Category : All ; Cycle : August 2015
Medical Articles
Aug20
असे का होते?: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर
असे का होते?: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर

विद्यार्थी: कुंभ मेळ्यामुळे असो की अन्य उत्सवांच्यामुळे; आपल्या रोजच्या जीवनातील दुष्ट शक्तींचा प्रभाव कमी होताना दिसत नाही! असे का होते?

शिक्षक: आपल्या परंपरा, आपले सण, आपले उत्सव, आपली व्रते ह्या सर्वांना महत्व आहे. पण त्यांचा उद्देश काय, त्यांचे महत्व किती आणि त्यांचे सामर्थ्य किती; हे आपल्याला कळत नाही. त्यांचा उद्देश; आपल्याला आपल्या आंतरिक चैतन्याचा आणि अमरत्वाचा अनुभव आणून देणे हाच आहे. ह्याच अनुभवाच्या मार्गावर असताना आपल्यात विधायक बदल होतात आणि वैयक्तिक व सामाजिक कल्याण साकार होते. म्हणूनच आणि त्यासाठीच; उत्सवांच्या पूर्वी, मध्ये आणि नंतर नामस्मरण करणे आणि करीत राहणे हे अत्यावश्यक आहे. आपण नामस्मरण केल्याशिवाय हे उत्सव चैतन्यमय आणि कल्याणकारी होऊ शकत नाहीत! किंबहुना; आपण काहीच न करता; ते आपसूक आणि स्वतंत्रपणे सामाजिक परिवर्तन घडवून आणतील असे समजणे ही एक मोठ्ठी गफलत आहे.

विद्यार्थी: नामस्मरणाने समाज कल्याण कसे होते हे पुन्हां एकदा सांगा.

शिक्षक: नामस्मरण करता करता ज्या प्रमाणात आपले संकुचित आणि मर्त्य व्यक्तित्व क्षीण होत जाते त्या प्रमाणात संकुचित दृष्टिकोन, विचार, भावना, वासना, ईच्छा, संकल्प आणि क्रिया यातून आपण हळु हळु मुक्त होत जातो. परिणामी आपले जीवन आणि समाजाचे जीवन; पवित्र प्रेमाने, व्यक्तिनिरपेक्ष दृष्टीकोनाने, उदात्त हेतूने, शुद्ध प्रेरणेने, न्यायी वृत्तीने, सदसद्विवेकबुद्धीने, आणि पूर्वग्रहविरहित भावनेने, नियंत्रित आणि संचालित होऊ लागते.

विद्यार्थी: अंतर्बाह्य चैतन्यामृताचा अनुभव घेण्याची ही चैतन्यसाधना खरोखरच सर्वांना शक्य आहे का?

शिक्षक: होय. खरोखरच ती सर्वांना शक्य आहे. सर्व धर्मांच्या, जातींच्या, पंथांच्या, वंशांच्या, देशांच्या, तसेच सर्व वयांच्या आणि व्यवसायांच्या लोकांना ही साधना शक्य आहे. अशिक्षित-सुशिक्षित, रोगी-निरोगी, अपंग-धडधाकट, सर्वांना शक्य आहे. त्याचप्रमाणे मनुष्य अशक्त असो वा सशक्त, व्यसनी वा निर्व्यसनी, अपराधी वा निरपराधी, गरीब वा श्रीमंत, सामान्य वा सत्ताधारी, कुणीही याला अपवाद नाही.

विद्यार्थी: पण हा एक चमत्कारच नाही का?

शिक्षक: हा चमत्कार वाटला तरी चैतन्यसाधना सर्वांना शक्य आहे कारण.... चैतन्यसाधनेचे मूळ असलेली चैतन्यतृष्णा कमी अधिक प्रमाणात असेल कदाचित; पण आपल्यातल्या सर्वच्या सर्वांना आहे! ज्ञानेश्वर महाराज ज्याला विश्वाचे “आर्त” असे म्हणतात तीच ही चैतन्यतृष्णा!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (737)  |  User Rating
Rate It


Aug20
सुखाचा सागर : डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर
सुखाचा सागर : डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर

विद्यार्थी: केवळ कुंभ मेळा नव्हे तर; एकंदरीतच धर्माचे बाह्य अवडंबर अधिक लोकप्रिय दिसते. किंबहुना एकूणच जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत प्रदर्शनाला अधिक महत्व आलेले दिसते. त्या मानाने नामस्मरण तेवढे लोकप्रिय दिसत नाही. बाह्य बाबी आपले मन पटकन आकर्षून घेतात; खरे ना?

शिक्षक: होय. अगदी खरे आहे. आपण जेव्हां स्वत:च्या; मूळ किंवा खऱ्या स्थितीपासून, अवस्थेपासून, स्थानापासून म्हणजेच स्वरूपापासून; नामविस्मरणाच्या ओढीने खेचले जाऊन; जडत्वामध्ये जखडलेले असतो, तेव्हां आपण; पाशवी वासना, क्षुद्र भावना, संकुचित विचार आणि तदनुषंगिक संकल्पात आणि कार्यात गुरफटून राहतो. जो अंतरात्मा किंवा आपली मूळ स्थिती आपल्या अंतर्यामी आणि आपल्या बाहेर; सर्वत्र पसरलेला सुखाचा सागर आहे, त्याच्यापासून तुटल्यामुळे आपण वारंवार सुख आणि दु:ख यांच्या हेलकाव्यात सापडतो. ह्या आत्मभ्रष्ट अवस्थेत; यशाचा भपका असो की अपयशाचा अंधार; आपण कायम दुबळे आणि अतृप्त राहतो!

विद्यार्थी: हे अगदी मनापासून पटते. केवळ कुंभ मेळा किंवा यात्राच नव्हे; तर; जीवनातील सर्वच दिखाऊ आचार विचारात आपण नेहमीच रुतलेले असतो!

शिक्षक: पण; नामस्मरणामुळे; काही प्रसंगांतून आणि अनुभवांतून समजू लागते की; नाम हाच ईश्वर, गुरु, ब्रह्म इत्यादी असून; नाम हाच सर्वज्ञ, सर्वव्यापी, सर्व शक्तिमान आणि सर्व सत्ताधीश परमात्मा आहे; आणि आपण करीत असलेल्या नामस्मरणासकट आपले सर्वस्व; ह्या नामात उगम पावते, नामावर जगते, नामाने नियंत्रित होते, नामाच्या योगाने बहरते, आणि नामातच लय पावते! पुढे; हे देखील लक्षात येते की; वास्तविक पाहता; नाम आणि माझा अंतरात्मा किंवा खरा “मी” एकच आहोत; फरक एवढाच; की जोपर्यंत मी नामविस्मरणा च्या स्थितीत होतो, तोपर्यंत माझा खरा “मी”; मला दुर्गम आणि दुर्लभ होता, किंवा अगम्य आणि अलभ्य होता!
पुढे आपल्या अथांग आणि अमर्याद अंतरात्म्याशी म्हणजे “नामाशी” जोडले गेल्यामुळे; संकुचित दृष्ट्या; आपण श्रीमंत असो वा गरीब, मोठे असू की लहान, गोरे असू की काळे, नेते असू की अनुयायी, निरोगी असू की रोगी आणि यशस्वी होवो की अयशस्वी; आपण क्षुल्लक लाभ-हानि च्या भ्रमामध्ये भरकटत नाही! ह्यालाच मूल्यव्यवस्था परिवर्तन असे म्हणतात आणि हाच वैयक्तिक आणि सामाजिक स्वास्थ्याचा गाभा आहे!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (795)  |  User Rating
Rate It


Aug20
गुरुपौर्णिमेचे महत्व: डॉ. श्रीनिवास जनार्
गुरुपौर्णिमेचे महत्व: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर

विद्यार्थी: सर, कुंभ मेळ्यामध्ये आलेले अनेक साधू आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे आपापल्या आश्रमात, मठात, गावी गेले आहेत. कृपया गुरुपौर्णिमेचे महत्व सांगा ना!

शिक्षक: गुरुचे महात्म्य गुरुगीता ह्या प्रख्यात ग्रंथात भगवान शिवानी माता पार्वतीला सांगितले आहे. गुरुचे समर्पक वर्णन खालील श्लोकात आले आहे.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर: l
गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै: श्री गुरवे नम:ll
गुरु हा; ब्रह्मा, विष्णू आणि शंकर; म्हणजे सत्व, रज आणि तम हे तीनही गुण आणि गुणातीत परब्रह्म तत्व आहे. त्याला नमस्कार असो.
काहींच्या मते आद्य गुरु भगवान शिव ह्यांनी गुरुपौर्णिमेला त्यांच्या सात शिष्याना (विश्वामित्र, जमदग्नी, भारद्वाज, गौतम, अत्री, वसिष्ठ आणि कश्यप हे सात ऋषी) योग शिकविला.
काहींच्या मते, गुरुपौर्णिमेला भगवान महर्षी व्यास यांचा पराशर ऋषी आणि सत्यवती माता यांच्या पोटी जन्म झाला.
काहींच्या मते, गुरुपौर्णिमेला विश्वातील गुरु तत्वाचा कल्याणकारी प्रभाव १००० पट अधिक असतो.
काहींच्या मते, गुरुपौर्णिमेला भगवान व्यास महर्षीनी ब्रह्मसूत्रे लिहून पूर्ण केली.

विद्यार्थी: गुरु आणि शिक्षक ह्यात काय फरक आहे?

शिक्षक: गुरुची व्याख्या करणे शक्य नाही. कारण जिथे आपली बुद्धी आणि कल्पना पोचू शकत नाही, तिथे गुरुचे अस्तित्व असते. किंबहुना, गुरुचे असणे; “असणे आणि नसणे” ह्या कल्पनांच्या पलिकडे असते.
गुरु-शिष्याचे नाते कळले तर गुरु आणि शिक्षक ह्यांतील फरक थोडासा स्पष्ट होईल. गुरु-शिष्याचे नाते जन्म-जन्मांतरीचे असते. गुरु देहात असो वा नसो त्याचे संरक्षक सान्निध्य शिष्याला जाणवत राहते. त्याच्या सान्निध्यात मनाला आत्यंतिक समाधान वाटते. त्याच्या विचारांनी मनाला अनंत उर्जा मिळत राहते. त्याच्या संकल्पात जीवनाची सार्थकता आणि कृतार्थता वाटते. त्याच्या आठवणीत मनाला संपूर्ण स्वास्थ्य लाभते, आणि त्याच्यापासून कधीही दूर जावेसे वाटत नाही. गुरुपासून शिष्याला काहीही लपवावेसे वाटत नाही. गुरु; त्याच्या शिष्याकडून; शिष्याच्या संपूर्ण कल्याणाव्यतिरिक्त; कधीही कोणतीही अपेक्षा करीत नाही. पण गुरुसाठी आपले सर्वस्व; अगदी आपला जीव देखील; ओवाळून टाकायची शिष्याची एका पायावर तयारी असते! शिक्षक आणि विद्यार्थी ह्यांचे नाते थोडाफार फरकाने सर्वांना परिचयाचे असल्यामुळे त्याचे वर्णन करण्याची आवश्यकता नाही.
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण सर्वांनी गुरुची शिकवण आस्थेने आणि उत्कटतेणे अंगिकारावी आणि त्यांच्या इच्छेनुरूप आनंदाने इतरांना सांगावी.


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (770)  |  User Rating
Rate It


Aug20
हेच एक मोठ्ठे आश्चर्य: डॉ. श्रीनिवास जनार्द&#
हेच एक मोठ्ठे आश्चर्य: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर

विद्यार्थी: मला वेगवेगळ्या कारणांसाठी कुंभ मेळ्याविषयी कुतुहूल वाटते! सर्वात महत्वाचे म्हणजे इतक्या प्राचीन काळी ह्या चार ठिकाणच्या सिंहस्थाच्या ग्रहस्थितीचा वेध घेणे, गणित मांडणे, त्या ग्रहस्थितीचे विवक्षित महत्व समजणे; हेच एक मोठ्ठे आश्चर्य आहे!
त्याचप्रमाणे, कोट्यावधी लोकांना ह्या विशिष्ट पर्वणीचे एवढे महत्व वाटणे आणि त्यांनी सर्व नफा-नुकसान बाजूला ठेवून ह्या पर्वणीच्या निमित्ताने स्नानासाठी येणे; आणि पिढ्यान-पिढ्या येत राहणे हे दुसरे मोठ्ठे आश्चर्य आहे! सर्वच बाबी राजकीय किंवा आर्थिक निकषांवर अभ्यासणे, पारखणे आणि निकालात काढणे हे चुकीचे आहे, सदोष आहे, अयोग्य आहे. एवढा मोठ्ठा मेळा आणि एवढ्या सातत्याने शतकानुशतके चालू राहतो, यात केवळ आर्थिक किंवा राजकीय स्वार्थ दिसणे, किंवा पारंपारिक अंधश्रद्धा असल्याचे आढळणे, हे मला हृदयशून्य आंधळेपणाचे वाटते! पण त्याचबरोबर त्याबद्दल साधक बाधक विचारच न करणे हे मला अगदीच निर्बुद्ध आडमुठेपणाचे आणि हेकटपणाचे वाटते!

शिक्षक: खरे आहे. संपूर्ण व्यक्ती आणि समाजाच्या हिताचे काहीतरी असल्याशिवाय कोणतीही परंपरा चालू राहू शकत नाही; हे जसे खरे, तसेच प्रत्येक परंपरेमध्ये देशकालमानानुसार काही दोष उत्पन्न होऊ शकतात; हे देखील खरे आहे! त्यामुळे निखळ जिज्ञासेतून आणि तेवढ्याच प्रामाणिकपणे अभ्यास करणे; आणि तो देखील शुद्ध अंत:करणाने, निस्पृह भावनेने आणि पूर्वग्रहविरहित बुद्धीने करणे; हे महत्वाचे आहे! नामस्मरणरुपी अमृताने जेव्हां चित्तशुद्धी होते, तेव्हां हे शक्य होते!

विद्यार्थी: कुंभ मेळ्याची परंपरा जेव्हां केव्हां सुरु झाली तेव्हांची आणि आत्ताची परिस्थिती ह्यांमध्ये फरक आहे. आजच्या औद्योगिकीकरणाच्या, लोकसंख्येच्या वाढीच्या, प्रदूषणाच्या, जंगल तोडीच्या, निसर्गाच्या लहरीपणाच्या आणि विशेषत: संकुचित आणि तात्कालिक स्वार्थाच्या बाजारबुणग्या मूल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर; कुंभ मेळ्याचे पुनरावलोकन आणि पुनर्मुल्यांकन व्हायला नको का? तसे काही प्रमाणात जरी आपल्याला करता आले तरी ते सर्वांच्या हिताचे ठरेल!

शिक्षक: मला असे वाटते की सर्व प्रथम; ह्या पर्व काळामध्ये कुंभ मेळ्याच्या जागी कोणते कल्याणकारी बदल होतात ह्याचा सखोल, सातत्यपूर्ण, चिकाटीने आणि दीर्घकाळ अभ्यास होणे अत्यावश्यक आहे. असे झाले, आणि अशा बदलांचा छडा लागला, तर पुढे हा देखील विचार करता येईल; की असे बदल अन्य मार्गाने घडवून आणून; कुंभ स्नान करू न शकणाऱ्या इतर सर्वांनाही त्यांचा फायदा मिळवून देता येतील का? अन्यथा हे तरी कळेल; की कुंभ मेळ्याच्या ठिकाणी असे काही महत्वपूर्ण बदल घडतच नाहीत!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (764)  |  User Rating
Rate It


Aug19
संजीवक परिणाम: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळी
संजीवक परिणाम: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर

विद्यार्थी: सर, ह्या कुंभ मेळ्याच्या निमित्ताने; आपल्या संपूर्ण वैयक्तिक आणि सामाजिक जीवनावर होणारे; नामस्मरणरुपी अमृतमंथनाचे संजीवक परिणाम मला तपशीलवार समजावून घ्यायचे आहेत!

शिक्षक: तुझी जिज्ञासा मला फारच कौतुकास्पद वाटते. एरवी; काहीजण कुंभमेळ्याकडे धार्मिक कडवेपणाने पाहतात, काहीजण न्यूनगंडातून पाहतात, काहीजण तुच्छतेने पाहातात, काहीजण भाबड्या भक्तिभावाने पाहतात, काही जण राजकीय फायद्या-तोट्याच्या दृष्टीने पाहतात, तर काहीजण आर्थिक नफ़ा-नुकसानीच्या दृष्टिकोनातून पाहतात. याशिवाय, काहीजण अचंबित होऊन पाहतात तर काहीजण भारावून जाऊन पाहतात. पण निखळ जिज्ञासेने आणि तितक्याच प्रामाणिकपणे क्वचितच कुणी कुंभ मेळ्याचा आणि एकूण समाजकल्याणाचा अभ्यास आणि विचार करतो!
नामस्मरणाने नामाशी म्हणजेच आपल्या अंतरात्म्याशी किंवा ईश्वराशी म्हणजेच अमृताच्या उगमाशी आपले नाते जुडते. किंबहुना आपले विचार, भावना, वासना आणि आपल्या कृती म्हणजेच आपला धर्म किंवा स्वधर्म येथूनच उगम पावतो किंवा प्रगट होतो. परिणामी; आपण आपापल्या क्षेत्रात अत्युत्तम काम करून कृतार्थ होऊ लागतो. ह्या कृतार्थतेमध्ये वैयक्तिक जीवनाचे जसे सार्थक आहे, तसेच वैश्विक सामाजिक जीवनातील सलोखा आणि सुसंवाद आणि सहकार्य आहे. म्हणूनच नामस्मरण, स्वधर्म आणि विश्वधर्म हे अतूटपणे संलग्न आहेत!
नामस्मरणरुपी अमृतमंथनातूनच विश्वकल्याणाची दृष्टी, इच्छा, विचार, योजना, धोरणे आणि कार्यक्रम प्रभावीपणे आविष्कृत होतात. उलटपक्षी, आपण जे जे करतो, ते ते, जर नामस्मरणरुपी अमृताची प्राप्ती करून देत असेल तर खरोखर व्यक्ती आणि समाजाच्या संपूर्ण कल्याणाचे होत असते हे देखील तेवढेच खरे!

विद्यार्थी: तुम्ही जे सांगता आहात, त्यावरून असे जाणवते आहे की, खरोखरच नामस्मरणाइतकी अहिंसक, सर्वतोपरी कल्याणकारी, पवित्रतम आणि त्याचबरोबर सामर्थ्यशाली अशी कृती नाही! विद्यार्थी: एका अर्थाने पाहिले तर; नामस्मरणाची शिकवण हा एक महान अमृतकुंभच आहे!

शिक्षक: नामस्मरण रुपी अमृतमंथन पुन्हा पुन्हा आपल्याला संजीवनी देत राहते आणि आपल्याकरवी अमृताचे सिंचन घडवून आणीत राहते! कुंभमेळ्याच्या मागील कल्याणकारी हेतू जपायचा आणि जोपासायचा असेल तर सर्वंकष कल्याण साधणारऱ्या नामस्मरणाला; अनन्यसाधारण महत्व आहे. ज्या देशात करोडो लोक दारिद्र्यरेषेच्या खाली जगतात त्या देशात तर नामस्मरणरुपी अमृताचे महत्व आणखीच जास्त आहे!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (693)  |  User Rating
Rate It


Aug19
ह्या म्हणण्याला काय अर्थ आहे? डॉ. श्रीनिवास &
ह्या म्हणण्याला काय अर्थ आहे? डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर

विद्यार्थी: खरोखर आपण अमर होऊ शकतो का? की हा एक भ्रम आहे? जर आपण मुळात मर्त्य असू तर अमर कसे होणार? आपल्या अस्तित्वाचा कोणता मर्त्य पैलू अमर होतो? आजपर्यंत अशा तऱ्हेने कोण अमर झाला आहे? उलटपक्षी; मुळात जर आपण “अमर” असू, तर मी “अमर होतो” ह्या म्हणण्याला काय अर्थ आहे?

शिक्षक: वास्तविक पाहता; आपण पूर्णपणे मर्त्यही असत नाही आणि पूर्णपणे अमर देखील असत नाही! आपल्या अस्तित्वाचा काही भाग मर्त्य असतो आणि काही भाग अमर असतो. पण; नामविस्मरणामुळे आपण मर्त्य भागाशी (जडत्वाशी) तद्रुप होऊन राहिल्यामुळे; अमरत्वाच्या (चैतन्याच्या) अनुभवाला मुकलेले असतो! परिणामी; आपण मर्त्य आणि संकुचित बनून संकुचित ध्येय, संकुचित विचार, संकुचित स्वार्थ यांच्या योगे; मर्त्य आणि संकुचित अवस्थेतच (अमरत्वाच्या अनुभवाविना) मरून जातो! नामस्मरणाने आपण आपल्यातील चैतन्याशी जोडले जातो. जडत्व कमी होत गेले की देहबुद्धी कमी होते म्हणजेच संकुचितपणा, क्षुद्रपणा, हीनपणा म्हणजेच पाप कमी होते!
अशा तऱ्हेने होणाऱ्या पापाच्या मुक्तीचेच दुसरे नाव म्हणजे सम्यक उत्क्रांती. अशा उत्क्रांतीमधूनच आपले व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने प्रगल्भ होते. आपले दृष्टिकोन, विचार, भावना, वासना आणि वागणूक कल्याणकारी होतात! म्हणूनच नामस्मरण करीत राहिल्यानेच आणि ते करता करता; आपण नावापुरते आस्तिक किंवा नास्तिक राहत नाही, संकुचित राहत नाही, तर विशाल होतो. आपण; सर्वांचे, संपूर्ण कल्याण साधण्यामध्ये; स्वत:ला झोकून दिलेले प्रकाशयात्री होतो, कल्याणयात्री होतो!

या प्रगल्भतेतूनच आपल्या स्पष्टपणे लक्षात येते; की नामविस्मरणामुळेच आपण संकुचित, उथळ आणि हीन बनलो होतो व नामविस्मरणामुळेच आपल्या जीवनात सर्वत्र आसुरी शक्तींचे थैमान सुरु होते! नामविस्मरण म्हणजे स्वत:ला विसरणे, म्हणजे स्वत:पासून तुटणे म्हणजे एक प्रकारचा आत्मद्रोह आहे. किंबहुना ते एक प्रकारचे मरणच आहे. म्हणूनच नामविस्मरण हा आत्मघात आहे. खरे पाहिले तर नामविस्मरण ही आत्महत्या आहेच; पण त्याहीपेक्षा जास्त म्हणजे नामविस्मरणामुळे स्वत:बरोबरच इतरांचे देखील चैतन्य संपून जाण्यास आणि त्यांचे अध:पतन होत होत; सर्वनाश होण्यास आपण कारणीभूत होतो. ह्या अर्थाने आपल्याला असेही म्हणता येईल की नामविस्मरण ही सर्वात मोठी पण सर्वात नजरेआड झालेली किंवा दुर्लक्षित राहिलेली अशी सर्वंकष हिंसा आहे!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (716)  |  User Rating
Rate It


Aug19
व्यक्ती आणि समाज ह्यांचे कल्याण : डॉ. श्रीनि&
व्यक्ती आणि समाज ह्यांचे कल्याण : डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर

विद्यार्थी: सर, व्यक्ती आणि समाज ह्यांचे कल्याण परस्परावलंबी आहे?

शिक्षक: होय तर! व्यक्ती आणि समाजव्यवस्था हे एक अखंड असे चक्रच आहे. व्यक्तीपासून सुरुवात केली तर; व्यक्तीचे शरीर, संवेदनाशीलता, वासना, भावना, कलात्मकता, सर्जनशीलता, उद्यमशीलता विचार, दृष्टिकोन, विचारप्रणाली, नेतृत्व, सत्ता, धोरणे, कायदे, नियम, योजना, कार्यक्रम, प्रत्यक्ष अंमलबजावणी; तसेच प्रथा, रूढी, संकेत, आणि ह्या सर्वांचे यांचे व्यक्तीवर होणारे परिणाम; म्हणजे अखेर व्यक्तीपर्यंत आपण येऊन पोचतो! असे हे एक अखंड चक्र आहे! नामस्मरणामुळे व्यक्ती आणि समाजव्यवस्थेचे अखंड चक्र नवचैतन्याने संजीवित होते! नामस्मरण हे सर्वांना सुलभ आहे. सर्वांना स्वीकारार्ह आहे. किंबहुना नामस्मरण हे संपूर्ण आरोग्याचे, संपूर्ण विकासाचे, संपूर्ण उत्क्रांतीचे आणि संपूर्ण कल्याणाचे गमकही आहे आणि लक्षण देखील आहे!

विद्यार्थी: हे सर्व ठीक आहे. पण, नामस्मरणाने आपण व्यक्तीश: समाधानी होऊ शकतो हे पटकन अंगवळणी पडत नाही!

शिक्षक: खरे आहे! कोणत्याही वस्तूचा उपयोग आणि उपभोग आपल्या नेहमीच्या अनुभवातला असला, तर समजणे सोपे असते. कुंभ मेळ्यामध्ये जाणे, देवदर्शन करणे, साधुदर्शन करणे, तेथे स्नान करणे, पूजा करणे, प्रसाद खाणे, एकमेकांना भेटणे, परस्परांशी बोलणे; अशा बाबी नेहमीच्या अनुभवातल्या असल्यामुळे पटकन समजतात आणि पटतात.
पण नामस्मरणाचे तसे नाही. नामस्मरणाचा अनुभव “समजत” नाही! नामस्मरण करूनच तो घेता येतो. वर्णन करून तो देता-घेता येत नाही! नामस्मरण करता करता आपली संवेदना, वासना, भावना आणि बुद्धी स्वत:च्या क्षुद्र गरजा, मागण्या, आवडी, छंद, लहरी, अभिनिवेश, पूर्वग्रह यातून सुटतात आणि नामाशी म्हणजेच सच्चिदानंदाशी निगडित होत जातात म्हणजेच मुक्त होत जातात.

विद्यार्थी: या विवेचनाचा शरीक्रियाशास्त्राशी काही संबंध आहे का?

शिक्षक: तुझा प्रश्न एकदम रास्त आहे! होय! ह्या विवेचनाचा शरीक्रियाशास्त्राशी निश्चित संबंध आहे! शरीरक्रियाशास्त्राच्या दृष्टीने पाहिल्यास; आपल्या वासना, भावना, विचार हे सर्व (आपण); नामाशी निगडित होत जाता जाता आपल्या शरीरातील वेगवेगळ्या रासायनिक आणि अंतस्त्रावी क्रिया-प्रतिक्रिया, चयापचयाच्या क्रिया, मज्जासंस्थेतील घडामोडी आणि व्यक्ती-व्यक्तीमधील परस्पर संबंध यांच्या प्रभावातून मुक्त होतात. यालाच देहबुद्धीचा प्रभाव कमी होणे म्हणतात. देहबुद्धी कमी होणे म्हणजेच पाप कमी होणे!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (763)  |  User Rating
Rate It


Aug19
कुंभमेळ्याच्या निमित्ताने : डॉ. श्रीनिवास 
कुंभमेळ्याच्या निमित्ताने : डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर

विद्यार्थी: सर, नामस्मरण हा सर्वांच्या कल्याणाचा पर्यायी मार्ग आहे असे गृहीत धरले तरी, कुंभमेळ्याच्या निमित्ताने त्या त्या ठिकाणी वेगवेगळी साधने, योगाचे प्रकार, यज्ञ, होम, हवन, पूजा-अर्चा, अनुष्ठाने, व्रत-वैकल्ये ह्यांची माहिती सामान्य लोकांनाही होते हे देखील खरे आहे ना?

शिक्षक: होय! कुंभ मेळ्याच्या निमित्ताने अंतीम सत्याचा किंवा अमरत्वाचा अनुभव घेण्यासाठी वेगवेगळे साधन मार्ग अवलंबणारे साधू, साधक, बैरागी, योगी, महंत एकत्र जमतात हे अगदी खरे आहे. त्यांच्याकडून बरेच काही शिकायला मिळते हे देखील खरे आहे. पण हे सगळे शिकत असताना आपली सदसद्विवेकबुद्धी जागी असणे अत्यावश्यक असते. त्याचप्रमाणे तरतमभाव ठिकाणावर असणे महत्वाचे असते. त्याच बरोबर कुंभ मेळ्यामध्ये देखील काय श्रेयस्कर आहे आणि काय हानिकारक आहे हे नीट समजले पाहिजे. खरे ना?

विद्यार्थी: होय. खरे आहे.

शिक्षक: आपली बुद्धी नि:पक्षपाती आणि निस्वार्थी होण्यासाठी नामस्मरण अत्यंत महत्वाची भूमिका बजावते. नामस्मरणाने आपला संकुचितपणा, क्षुद्र स्वार्थ, पूर्वग्रह, अभिनिवेश, द्वेष, अहंकार इत्यादी दुर्गुण हळूहळू पण निश्चित गळून पडतात. अशा तऱ्हेने बुद्धी आणि दृष्टी स्वच्छ झाल्यामुळे सत्य जाणून घेणे आणि अनुभवणे शक्य होते! त्यामुळे कुंभ मेळाच नव्हे तर जीवनातली प्रत्येक गोष्ट यथार्थपणे समजण्याची आणि कुवत नामस्मरणाने येते. त्याद्वारेच अखेर सत्य समजणे आणि अनुभवणे शक्य होते! फार काय सांगू? आपण सतत नामस्मरण केल्याने अशी विधायक उर्जा तयार होते की तिच्यामुळे कुंभ मेळ्यामधील असंख्य लोकांना देखील उन्नत होण्यासाठी जोर मिळू शकतो!

विद्यार्थी: नामस्मरण केल्यामुळे अंतीमत: अमरत्वाचा अनुभव येत असला तरी नामस्मरण करता करता; संपूर्ण समाजाचे कल्याण होते असे आपण जे म्हणता ते मला अधिक स्पष्ट करून सांगा.

शिक्षक: नामस्मरणाने समाजाचे कल्याण कसे होते ह्याला जीवशास्त्रातील एक उदाहरण घेतले तर समजायला सोपे जाईल.
ज्याप्रमाणे आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीच्या उत्तम आरोग्यातून आपले म्हणजे संपूर्ण व्यक्तीचे आरोग्य सिद्ध होते, त्याचप्रमाणे नामस्मरणाने आपल्या वैयक्तिक जीवनात जे सच्चिदानंद वैभव प्रगट होते ते वैभव संपूर्ण समाजात देखील आविष्कृत होते. उलटपक्षी; ज्याप्रमाणे आपल्या संपूर्ण वैयक्तिक आरोग्याने आपल्या शरीरातील पेशी आरोग्यसंपन्न होतात, त्याचप्रमाणे समाजात जे सच्चिदानंद वैभव आविष्कृत होते, ते प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात देखील अवतरते!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (690)  |  User Rating
Rate It


Aug19
लोककल्याणाचा पर्यायी मार्ग : डॉ. श्रीनिवास &#
लोककल्याणाचा पर्यायी मार्ग : डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर

शिक्षक: कुंभ मेळ्यामध्ये पोचणे कोट्यावधी गरीब, आजारी, वृद्ध, अपंग व नाजूक स्थितीतील लोकांना शक्य होत नाही हे अगदी खरे आहे! त्याचप्रमाणे कोट्यावधी लोकांची कुंभ मेळ्याच्या जागी सोय करणे हे सरकारला देखील वेगवेगळ्या राजकीय, सामाजिक व आर्थिक परिस्थितीत शक्य असेलच असे नाही. साहजिकच कुंभ मेळ्यामध्ये आणि इतर तीर्थक्षेत्रांमध्ये देखील अन्न, पाणी, निवारा, शौचालये, स्नानगृहे, सुरक्षा इत्यादिंची सोय करणे सरकारला शक्य होईलच असे नाही! अशा वेळी लोककल्याणाचा पर्यायी मार्ग तयार असणे आणि माहीत असणे अत्यंत महत्वाचे आहे!
विद्यार्थी: तुमच्या मते नामस्मरण हा असा पर्यायी मार्ग आहे?
शिक्षक: होय! नक्कीच! ह्या सर्व बाबींचा विचार केला तर, नामस्मरण हा निव्वळ पर्यायी मार्गच नव्हे तर, नामस्मरण स्वीकारणे, आचरणात आणणे, आणि त्याचा प्रसार करणे ही आज आपल्या सर्वांसाठी एक दैवदुर्लभ अशी सुवर्ण संधी आहे. किंवा अन्य शब्दांत सांगायचे तर ही खरोखर ईश्वराची अजिंक्य, अजेय आणि सर्वसत्ताधीश अशी कृपाच आहे!
विद्यार्थी: तुम्ही म्हणता ते मी नाकारत नाही. पण नामस्मरण हे संपूर्ण समाजाचे कल्याण कसे करते?
शिक्षक: सर्वसामान्यपणे (नामविस्मरणामुळे) आपली उर्जा, आपले संकल्प, आपली कृती ही आपल्यातील जडत्वाकडे म्हणजेच वैयक्तिक आणि संकुचित स्वार्थाकडे खेचली जात असते. अशा तऱ्हेने लाखो लोकांची उर्जा, संकल्प आणि कार्य जेव्हां संकुचित स्वार्थाच्या दिशेला वळतात, तेव्हां त्यातून स्वार्थांध आणि समाजद्रोही धोरणे, रूढी, परंपरा, कायदे, नियम, संकेत, योजना, कार्यक्रम इत्यादी तयार होतात! यातूनच सामूहिक अवनती होते. याउलट नामस्मरणाच्याद्वारे आपले विचार, आपल्या भावना, आपल्या वासना, आपली शक्ती आणि आपले संकल्प; उदात्त बनतात आणि आणि सामुहिक कल्याणाच्या दिशेने वळतात! अशा तऱ्हेने लाखो लोकांचे विचार, भावना, वासना, शक्ती आणि संकल्प; एकत्र काम करू लागले, की समष्टीच्या कल्याणाचे भव्य दिव्य पर्व सुरु होते!
अणुबॉम्ब किंवा हैड्रोजनबॉम्ब ह्या विनाशक बॉम्बनी एकाच वेळी लाखो लोक मरतात; तर नामस्मरण ह्या “विधायक बॉम्बने” एकाच वेळी लाखो लोक उन्नत होतात!
युद्धाच्यावेळी रणभेरी वाजू लागल्या की योद्ध्यांच्या अंगात जशी एकदम वीरश्री संचारते, तसे, नामस्मरणाने लाखो जीवांच्या आंत कळत-नकळत एकदम चैतन्य संचारते! आपण नामस्मरण करू लागलो की आपल्यालाच नव्हे तर संपूर्ण समाजाला अंतर्बाह्य व्यापणारी; उर्ध्वगामी उत्क्रांती सुरु होते.


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (677)  |  User Rating
Rate It


Aug19
त्या कोट्यावधींचे काय?डॉ. श्रीनिवास जनार्
त्या कोट्यावधींचे काय?: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर

विद्यार्थी: एकीकडे कुंभमेळ्यात जावे असे वाटते पण प्रत्यक्षात जाऊन पाहिले तर मन खिन्न होते असा अनेकांचा अनुभव आहे! श्रद्धा कमी असल्यामुळे असे होते का? पण मग अशा अश्रद्ध लोकांचे काय? शिवाय, कुंभ मेळ्यामध्ये जरी कोट्यावधी लोक जात असले तरी त्याच्या शेकडोपट लोक तिथे जाऊ शकत नाहीत. त्या कोट्यावधींचे काय? त्यांना चैतन्याचा लाभ शक्य नाही?
शिक्षक: आजपर्यंत जे महायोगी, महात्मे, ऋषी, संत; होऊन गेले ते सर्व कुंभ मेळ्यामध्ये जात होते असे नाही. त्याचप्रमाणे कुंभ मेळ्यामध्ये सहभागी झालेल्या सर्वांना अमृतत्वाची प्राप्ती झाली असेही नाही. शिवाय; कुंभ मेळ्याच्या मुळाशी अमृतत्वाची प्राप्ती हा हेतू असला तरी कालांतराने त्याच्या आयोजनामध्ये राजकीय, सामाजिक, आर्थिक असे अनेक पैलू नसतीलच असे नाही!
विद्यार्थी: म्हणजे, कुंभ मेळ्याकडे जसे कुत्सितपणे आणि तिरस्काराने पाहणे योग्य होणार नाही, तसेच त्याच्याकडे; मानव जातीचा एकमेव तारणहार म्हणून पाहणे देखील योग्य ठरणार नाही. खरे ना?
शिक्षक: होय! कारण, वर पाहिलेल्या कुंभमेळ्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीतील कथेतल्या अमृतमंथनाशिवाय निरंतर चालणारे असे; आणखी एक विलक्षण अमृतमंथन गेली हजारो वर्षे चालू आहे! हे अद्वितीय अमृतमंथन म्हणजे नामस्मरण होय!
ह्यालाच जिक्र, जाप, जप, सुमिरन, सिमरन अशी अनेक नावे आहेत. नामस्मरणाचा गर्भितार्थ स्वत:च्या अंतरात्म्याचे विशिष्ट नावाने स्मरण करणे आणि ते करता करता; त्या नावाशी (नामाशी), म्हणजेच स्वत:च्या अंतरात्म्याशी म्हणजेच ईश्वराशी जोडले जाणे आणि त्यात विलीन होऊन अमर होऊन जाणे!
विद्यार्थी: ह्या अमृतमंथनाचे वैशिष्ट्य काय?
शिक्षक: ह्या अमृतमंथनाचे वैशिष्ट्य असे की त्यातून निघालेल्या अमृताचे सिंचन; कोण्या एका विशिष्ट जागेपुरते आणि विशिष्ट दिवसापुरते मर्यादित नाही. ह्या अमृतमंथनातून होणारे अमृतसिंचन जगभर सतत चालू आहे, प्रत्येक हृदयात (कळत असो वा नकळत) चालू आहे आणि जगाच्या कोनाकोपऱ्यात चालू आहे! ह्या सिंचनाला सोवळे, ओवळे, जात, धर्म, पंथ, उच्च, नीच, श्रीमंत, गरीब, मुहूर्त इत्यादी कशाकशाचीच अट नाही! कुठेही जाण्यायेण्याची, खर्च करण्याची, विशिष्ट आचार-विचारांची, परंपरा-रुढींची; कसलीच अट नाही. नामस्मरणरुपी अमृतमंथनाचा कल्याणकारी परिणाम आपल्या आणि समाजाच्या सर्व अंगांवर आणि सर्व पैलूंवर होतो. ह्या अमृत प्राप्तीने; जड, मर्त्य आणि त्यामुळे बद्ध असे (पापी) जीवन संपुष्टात येते आणि अमृतत्वाचा अनुभव येतो.


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (645)  |  User Rating
Rate It


Browse Archive